Publish Date: Thu, 30 May 2019 (09:50 IST)
Updated Date: Thu, 30 May 2019 (09:52 IST)
नारायण राणे व शिवसेना हा वाद तसा काही नवा नाही. लोकसभा 2014ची निवडणूक असो, विधानसभा असो, वांद्रे पोटनिवडणूक असो की, 2019ची लोकसभा निवडणूक, शिवसेनेने नारायण राणे यांना कोकणात जोर का धक्का दिला आहे. कोकणात फक्त शिवसेनाच वाघ आहे हे दाखवून दिले आहे. मात्र आता राणेंना आणखी राजकीय त्रास द्यायला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्रात मंत्रिपद देण्याचा विचार करत आहे. राऊत मोदी सरकारच्या नव्या मंत्रिपद शपथ सोहळ्यात शपथ घेतील असे शिवसेनेच्या खात्रीलायक सूत्रांनी बोलताना सांगितले आहे.
कोकणात शिवसेना खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री दीपक केसरकर आणि वैभव नाईक यांनी राणेंचे गड उद्ध्वस्त करत तळकोकणासह शिवसेनेचा एक दबदबा तयार केला. त्यामुळे राजकीयदृष्टया पराभूत झालेल्या राणेंना कोकणात आणखी कमी करायला विनायक राऊत यांना मंत्रिपद द्यावे लागेल, अशी शिवसेनेची धारणा आहे.
कोकणात नारायण राणे यांच्या विरोधात रान उठवणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या दीपक केसरकर यांना शिवसेनेने राज्यमंत्रीपद दिले होते. आता हीच रणनीती शिवसेना आखत आहे. राऊत यांना मंत्रिपद देऊन तळकोकणात राणेंचे उरलेसुरले अस्तित्व शिवसेनेला संपवायचे आहे, राऊताना मंत्रिपद दिले तर तळकोकणात उरलेला कणकवली मतदार संघदेखील काबीज करता येईल अशी खेळी सध्या शिवसेनेची आहे.