Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

SC-ST आरक्षणात उपवर्गीकरण, क्रिमी लेअर तरतुदीची शिफारस; काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (09:25 IST)
अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाच्या अंतर्गत सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकते असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने आज ( 1 ऑगस्ट) दिला आहे.
 
7 जणांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. 6 जणांनी या निर्णयाच्या बाजूने मत दिले तर एक मत निर्णयाविरोधात होते.
 
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गात आणखी उपवर्गीकरण शक्य आहे असं सुप्रीम कोर्टाने निकालाच्या वाचनावेळी म्हटले.
 
आज निर्णय दिलेल्या घटनापीठात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. बी. आर. गवई, न्या. विक्रम नाथ, न्या. बेला त्रिवेदी, न्या. पंकज मित्तल, न्या. मनोज मिश्रा आणि न्या. सतीशचंद्र मिश्रा यांचा समावेश होता.
 
2004 मध्ये सुप्रीम कोर्टानेच असं वर्गीकरण करणं शक्य नसल्याचा निर्णय दिला होता. तो निर्णय आज बदलण्यात आला आहे.
 
2006 मध्ये पंजाब सरकारने एक कायदा संमत केला होता. त्यानुसार अनुसूचित जातींमधील दोन जातींना पहिलं प्राधान्य देण्यात यावं असं त्यात म्हटलं होतं.
 
पंजाब आणि हरियाणा कोर्टाने अनुसूचित जातींमधल्या अर्ध्या जागांवर आरक्षण देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्यानंतर सरकारने हा कायदा आणला होता.
 
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा म्हणाले की 'अनुसूचित जाती' हा काही एकसंध वर्ग नाही त्यामुळे योग्य माहितीच्या आधारे या वर्गाचं उपवर्गीकरण करता येऊ शकतं.
 
इतर न्यायमूर्तींनी आपला निर्णय दिल्यावर न्या. बेला त्रिवेदी या निर्णयाच्या विरोधात होत्या. त्यांच्या मते आरक्षणासाठी असं वर्गीकरण शक्य नाही.
 
एससी आणि एसटी समुदायासाठी सुद्धा क्रिमी लेअर आणि नॉन क्रिमी लेअर हे प्रवर्ग आणता येऊ शकतात असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
क्रिमी लेअर आणि नॉन क्रिमी लेअर ठरवण्यासाठी सरकारने धोरण आखावे असे न्यायालयाने सुचवले आहे.
 
निर्णयातले महत्त्वाचे मुद्दे कोणते?
हा निर्णय देताना कोर्टाने सांगितलं की उपवर्गीकरण केल्यावर उपवर्गाला 100% टक्के आरक्षण देता येणार नाही.
 
सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. पहिलं म्हणजे आरक्षण दिलेल्या वर्गाचं उपवर्गीकरण करावं की नाही?
 
दुसरं म्हणजे ई. व्ही. चिनय्या वि. आंध्र प्रदेश (2005) या केसचा निर्णय किती योग्य आहे?
 
या निर्णयानुसार राज्यघटनेच्या कलम 341 अंतर्गत अनुसूचित जाती हा एकसंध समुदाय असून त्याचं उपवर्गीकरण करणं शक्य नाही असा निर्वाळा देण्यात आला होता.
 
यावर्षी 8 फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर कोर्टाने निर्णय राखीव ठेवला होता.
 
हा निर्णय देताना कोर्टाने सांगितलं की, आजच्या निर्णयामुळे घटनेच्या कलम 14 चे उल्लंघन होणार नाही.
 
तसंच उपवर्गीकरण केल्यामुळे कलम 341(2) या कलमाचं उल्लंघन होणार नाही.
 
सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ऐतिहासिक आणि अनुभवजन्य पुरावे असं प्रमाण देतात की अनुसूचित वर्ग हा सामाजिकदृष्ट्या विविधता असलेला वर्ग आहे. त्यामुळे सरकार राज्यघटनेच्या कलम 15 (4) आणि कलम 16 (6) अंतर्गत उपवर्गीकरण करू शकते.
 
न्या. बी. आर. गवई त्यांचा निर्णय देताना म्हणाले की समाजातील मागासवर्गाला प्राधान्य देणं ही राज्याची जबाबदारी आहे. एससी एसटी प्रवर्गातील काही लोकच आरक्षणाचा लाभ घेतात.
 
आपल्याला सत्य परिस्थिती नाकारता येणार नाही. एससी आणि एसटी समुदायातील अनेक जातींची शतकानुशतकं कुचंबणा होत आहे याकडे गवई यांनी लक्ष वेधलं.
 
ई. व्ही. चिनय्या केसमध्ये दिलेल्या निर्णयात कलम 341 हा आरक्षणाचा पाया आहे हा मुद्दा उपस्थित केला होता. कलम 341 मध्ये कोणत्या जातींना आरक्षण द्यावे याबद्दल चर्चा केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
समाजाच्या एका मोठ्या प्रवर्गाकडून एका गटावर प्रचंड अन्याय होत आहे यामुळे प्रवर्ग करणं महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले.
 
अनुसूचित जातींनाही क्रिमी लेअरचं तत्त्व लागू होऊ शकतं असं मत न्या. विक्रम नाथ यांनी व्यक्त केलं. न्या. पंकज मित्तल यांनीही या मुद्द्याला दुजोरा दिला.
 
तसंच आरक्षण एका पिढीपर्यंतच मर्यादित हवं. जर पहिल्या पिढीला आरक्षण दिलं तर दुसऱ्या पिढीला ते मिळू नये असं मत न्या. मित्तल यांनी नोंदवलं.
 
न्या. बेला त्रिवेदी यांनी विरोध का केला?
न्या. त्रिवेदी यांच्या मते कलम 341 अंतर्गत असलेली अनुसूचित जाती आणि जमातींच्या यादीत राज्यांना बदल करता येत नाही. या कलमानुसार राष्ट्रपती त्यांच्या अधिकारानुसार काही जातींची भर या यादीत घालू शकतात.
 
त्याला 'प्रेसिडेन्शियल लिस्ट' असं म्हणतात. त्यामुळे संसदेने कायदा केला तरच या यादीत जातींमध्ये आणखी भर घालता येते किंवा त्या कमी करता येतात. कलम 341 चा उद्देश एससी एसटीच्या यादीतून राजकीय हस्तक्षेप दूर करावा हा आहे, असं मत न्या. त्रिवेदींनी मांडलं.
 
राष्ट्रपतींनी भर घातलेल्या यादीमध्ये एखाद्या उपवर्गाला प्राधान्य दिलं तर त्याच प्रवर्गातील इतर वर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय होईल असं न्या. त्रिवेदी यांचं मत आहे.
 
कार्यकारी किंवा संसदीय अधिकार नसताना राज्यं असं उपवर्गीकरण करून सर्व एससी वर्गाला असलेल्या लाभांवर गदा आणू शकत नाही. त्यामुळे अधिकारांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे असं मत त्यांनी मांडलं.
 
सुप्रीम कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा का आहे?
आज दिलेल्या निर्णयाने कोर्टाने त्यांचाच 2004 साली दिलेला निर्णय दिलेला रद्दबातल ठरवला. त्यावेळी पाच न्यायमूर्तींनी ई.व्ही. चिनय्या केसमध्ये दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती आणि जमाती एकसंध गट आहेत आणि त्याचं पुन्हा उपवर्गीकरण करता येणार नाही.
 
आधीच अस्तित्वात असलेल्या आरक्षणात आरक्षण देता येणार नाही असं या निर्णयात म्हटलं होतं.
 
अशा प्रकारे उपवर्गीकरण केलं तर घटनेतील कलम 14 या कलमाचं उल्लंघन होईल असं या निर्णयात म्हटलं होतं.
 
पंजाब अनुसूचित जाती जमाती कायदा 2006 च्या कलम 4 (5) नुसार नोकरीमध्ये 50 टक्के जागा अनुसूचित जातीच्या लोकांसाठी आरक्षित असतील आणि वाल्मिकी आणि मजहबी शीख लोकांना त्यांच्या उपलब्धतेनुसार देण्यात येतील, असे म्हटले होते.
 
अनुसूचित जातीतले उमेदवार असतील तर या जातीच्या लोकांना आधी प्राधान्य देण्यात येईल असा निर्णय देण्यात आला होता. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही तरतूद फेटाळून केली होती.
 
पंजाब सरकारने 2011 मध्ये सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यानुसार सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला लागू नाही असा युक्तिवाद करण्यात आला होता.
 
पंजाब सरकारच्या याचिकेवर निर्णय देताना न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने चिनय्या प्रकरणातल्या निर्णयापेक्षा वेगळं मत नोंदवलं होतं आणि हे प्रकरण एका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज हा निर्णय देण्यात आला आहे.
 
सुप्रीम कोर्टातील वकील श्रेयस गच्चे यांच्याशी बीबीसी मराठीने या निर्णयानंतर संवाद साधला.
 
ते म्हणाले, “आजच्या निर्णयामुळे 59 जातींना 13 टक्के आरक्षण जे दिलं आहे त्यात आता प्रत्येक जातीचा इम्पिरिकल डेटा देऊन सरकारला प्रत्येक जातीतल्या लोकांना आरक्षण देता येईल. यामुळे अति मागासलेला वर्ग आहे त्याचं पुनरुत्थान करता येईल. पण या निर्णयाचा एक तोटा असाही आहे की कोणत्या वर्गाला आरक्षण द्यायचं याचा निर्णय सरकारकडे राहील. त्यामुळे एखाद्या जातीवर्गाला खूप पुढे आणणं किंवा मागे सारणं सरकारच्या हातात राहील.”
 
प्रकाश आंबेडकरांचा विरोध
या निर्णयाचा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे.
 
प्रकाश आंबेडकर म्हणतात की, अनुसूचित जातिअंतर्गत मागासलेपणा मोजण्यासाठी कोणते निकष लावले जातील याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात मौन बाळगण्यात आले आहे.
 
ते म्हणतात की, 'ई. व्ही. चिनय्या प्रकरणातील निकाल अजूनही भक्कम आहे. जरी आरक्षणाअंतर्गत असलेल्या वर्गवारीला 6 विरुद्ध 1 अशी मान्यता दिलेली असली तरी कलम 14 च्याच विरोधातला हा निर्णय आहे.'
 
आरक्षणाचा लाभ केवळ SC, ST आणि ओबीसीच घेत नाहीत तर खुल्या प्रवर्गातील काही घटकांना देखील मिळतो. या निर्णयामुळे राज्यघटनेच्या कलम 14 चे उल्लंघन होत आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनी या निर्णयावर सडकून टीका केली आहे. मंडल म्हणतात, “बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो जातींमध्ये विभागल्या गेलेल्या अस्पृश्यांना एकत्र आणून अनुसूचित जातींना एकत्र आणलं होतं.
 
"त्यामुळे या न्यायमूर्तींना त्यांचं विभाजन करण्याचा अजिबात अधिकार नाही,” असं त्यांनी एक्स (ट्विटर) वर लिहिलं आहे.
 
NDA सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाने या निर्णयाचा विरोध केला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले चिराग पासवान हे या पक्षाचे प्रमुख आहेत.
 
पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की लोक जनशक्ती पक्ष या निर्णयाच्या बाजूने नाही.
 
जोपर्यंत अस्पृश्यतेसारख्या कुप्रथा अस्तित्वात आहेत तोपर्यंत एससी-एसटींसाठी उपवर्ग आणि क्रिमी लेअरची तरतूद नसावी अशी लोक जनशक्ती पक्षाचे दिवंगत संस्थापक रामविलास पासवान यांची देखील भूमिका होती. त्यामुळे आम्ही या निर्णयाच्या बाजूने नाहीत, असे पक्षाने म्हटले आहे.
 
या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा असे देखील लोक जनशक्ती पक्षाने म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

गणेश उत्सवादरम्यान नितेश राणें यांनी दिले पुन्हा वादग्रस्त विधान, एफआयआर दाखल

मोमोज खात असताना तरुणाची गोळ्या झाडून हत्या

तुम्ही घरी किती सोने ठेवू शकता? भारतात काय कायदा जाणून घ्या

1.30 कोटी महिलांसाठी खुशखबर, PM मोदी वाढदिवसानिमित्त देणार गिफ्ट, कसा मिळणार योजनेचा लाभ?

हिंगोलीत मुलीचा विनयभंग, हिंदू संघटनांचा पोलीस ठाण्याच्या बाहेर गोंधळ

पुढील लेख
Show comments