Publish Date: Sat, 08 Aug 2020 (09:19 IST)
Updated Date: Sat, 08 Aug 2020 (09:24 IST)
कोरोनामुळे देशात बंद असलेल्या शाळा १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना आखली आहे. ३१ ऑगस्टला यासंदर्भात केंद्राकडून घोषणा होऊ शकते, असे वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.
देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्था २३ मार्चपासून बंद आहेत. त्यामुळे सध्या देशात ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र, ३१ ऑगस्टला जाहीर होणाऱ्या अनलॉकच्या नव्या गाइडलाइन्समध्ये शाळा सुरू करण्याबाबतची घोषणा होऊ शकते. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत कसे आणि कधी आणायचे हे संबंधित राज्य ठरवतील.
शाळांना दोन शिफ्टमध्ये काम करावे लागू शकते. सकाळी ८ ते ११ आणि १२ ते ३ अशा शिफ्ट असतील. ११ ते १२ या ब्रेकमध्ये शाळा सॅनिटाइज करावी लागेल. प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याची कोणतीही योजना नाही. वेळमर्यादेत सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाऊ शकतात.एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना एकाच दिवशी शाळेत बोलावले जाणार नाही. प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल. पहिल्या पंधरवड्यात १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाईल, असेही सांगण्यात येते.