Publish Date: Wed, 20 Mar 2024 (09:34 IST)
Updated Date: Wed, 20 Mar 2024 (09:40 IST)
मॉरिस नरोनानं अभिषेकला बोलावले तिथे मलाही घेऊन या असं सांगण्यात आलं होतं. अभिषेकनं मला ही गोष्ट सांगितली, पण उशीर झाल्याने मला अभिषेकनं दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवले. याचा अर्थ मलाही मारण्याचा कट होता. माझ्या २ मुलांचे नशीब म्हणून मी तिथे पोहचले असा खुलासा करत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. या तपासात आम्ही जमा केलेली माहिती तपास यंत्रणा आणि पोलीस आयुक्तांना दिली. हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख आणि अज्ञात व्यक्तीचा होत असलेला वावर याबाबत सखोल तपास तपास करावा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु याबाबत पोलिसांनी आजवर सखोल तपास केल्याचं दिसत नाही. या प्रकरणी हायकोर्टात रिट पीटीशन करून तपास यंत्रणेकडून तपास काढून दुसऱ्या यंत्रणांकडे हा तपास द्यावा अशी दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
तर माझ्या मुलाच्या हत्येनंतर राज्याचे गृहमंत्री, मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली बेजबाबदार विधाने मूळ प्रश्नापासून वळवण्याचा आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहेत. मुलाच्या हत्येनंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वधर्मीयांनी प्रत्यक्ष भेटून आमच्या परिवाराचे सांत्वन केले. मात्र गृहमंत्री यांनी विधान परिषद सभागृहात केलेले निवेदन राजकीय असून मनाला वेदना देणारे आहे. त्यामुळे तपासाची दिशाही बदलली असा आरोप ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी केला.
Edited By -Ratnadeep Ranshoor