Publish Date: Tue, 09 Feb 2021 (07:26 IST)
Updated Date: Tue, 09 Feb 2021 (07:28 IST)
'मी पुन्हा येईन' म्हणणार्या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. "आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही, असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
"गेले २२ वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे आणि फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' ची स्वप्ने पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार २५ वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार आहे," असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.