Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावरकर आणि आपण

Webdunia
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं. 

राष्ट्रीय पातळीवर ज्यांचं नाव घ्यायला पाहिजे अशा व्यक्तिंमध्ये एकेकाळी महाराष्ट्रातील अनेक व्यक्ती होत्या. त्यात निर्विवादपणे सावरकर होते. त्यावेळी त्यांचे महत्त्व तेवढे होतेही. पण पुढे त्यांची प्रतिमा आणखी मोठी होऊ नये यासाठीही प्रयत्न झाले किंवा केले गेले. देशात कॉंग्रेसचे राज्य असल्याने आणि सावरकर कॉंग्रेसविरोधी असल्यानेही सावरकरांसंदर्भात, त्यांच्या विचारांसंदर्भात फार काही झाले नाही. अगदी आत्ता आत्तापर्यंत सावरकर द्वेष संपलेला नाही. मणिशंकर अय्यर नावाचा एक कॉंग्रेसी उटपटांग मंत्री अंदमानमध्ये असलेल्या सावरकरांच्या काव्याच्या ओळी पुसायचे धाडस करतो, तरी सत्ताधारी कॉंग्रेस सदस्यांपैकी कोणीही हे चुकीचे केले म्हणून मान ताठ करून सांगत नाही. म्हणजे राज्यात सावरकर गुणगान करणारे कॉंग्रेसचे खासदार हायकमांडसमोर मान तुकवून पिचलेल्या कण्याचे दर्शन घडवतात.
थोडं मागे जायचे झाले तर गांधीहत्येला सावरकरांचा आशीर्वाद होता, म्हणूनही त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यासाठी झगडणार्‍या या स्वातंत्र्यसूर्याने स्वातंत्र्यासाठी शंभर वर्षाची शिक्षा झाली पण आपले उद्दिष्ट साध्य झाल्यानंतरही त्यांना कोठडी चुकली नाही. गांधी हत्येच्या निमित्ताने हेही घडले.

सावरकरांचे जहाल हिंदूत्ववादी विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मानवत नाहीत. म्हणून संघाच्या व्यासपीठावर सावकरांच्या फोटोला सहसा स्थान नसते. मुळात सावकरांनीच हिंदू महासभा नावाचा वेगळाच पक्ष काढला होता. पुढे संघप्रणित जनसंघ हा राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतरही हिंदू महासभेचे स्थान कायम होते. सावरकरांची विज्ञाननिष्ठाही संघीयांना अडचणीत टाकणारी होती. 'गाय हा उपयुक्त पशू असून प्रसंग ओढवला तर गायीचे मांसभक्षण करायलाही हरकत नाही' असे सावरकरांचे 'प्रॅक्टिकल' विचार पुराणमतावादाला धरून चालणार्‍या संघाला परवडणारे नव्हते. त्यामुळेच संघाने सावरकरांना दूर ठेवूनच चालायला सुरवात केली.

समाजवाद्यांना सावरकरांचे हिंदूत्ववादी धोरणच मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी सावरकरांची तळी उचलून धरण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे समाजवाद्यांनी कायमच सावरकरांना दूरच ठेवले. त्यामुळे सावकर उपेक्षितच राहिले. कम्युनिस्टांनी तर सावरकरांवर टीकेची भूमिका स्वीकारणे पसंत केले. सुभाषचंद्र बोस व सावरकर हे कम्युनिस्टांच्या टिकेचे लक्ष्य होते. इतकेच नव्हे तर अंदमानच्या तुरूंगातून राजकीय आंदोलनात न पडण्याच्या अटींवर सावरकर बाहेर पडले ही सुद्धा कम्युनिस्टांसाठी टीकेची बाब ठरली. कम्युनिस्टांच्या मते सावरकरांनी ब्रिटिशांसमोर गुडघे टेकले. पण मुळात सावरकरांसारखा अतिशय महत्त्वाचा नेता तुरूंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर पडून काही तरी कार्य करत असले तर ते जास्त महत्त्वाचे आहे, हे समजण्याइतकी कम्युनिस्टांची बुद्धी कधी प्रगल्भ झालीच नाही. रत्नागिरीला अज्ञातवासात असतानाही सावरकरांनी राजकीय कार्य लपून छपून केलेच.

मुळात मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावीच लागते, हे शिवाजी महाराजांचे धोरण सावरकरांनी अतिशय मुत्सद्दीपणे राबविले. त्यामुळे सावरकरांच्या या निर्णयात चुक काय? तेच कळत नाही. कम्युनिस्टांपैकी कोणत्या नेत्याला शंभर वर्षे तुरूंगवास झाला? कोणी कोलू ओढणे, अतिशय विपरीत स्थितीतही जगण्याची लालसा जिवंत ठेवत ठामपणे जिवंत रहाणे हे कुणी सहन केले?

शिवाय सावरकरांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्यही याच काळात केले, हेही कम्युनिस्ट विसरतात. गांधींच्या अस्पशता निर्मुलन चळवळीचे गोडवे गायले जात असताना गांधी चार्तुवर्ण्यावर विश्वास ठेवणारे होते, याकडे दुर्लक्ष होते आणि 'जातीजातीतील मानवी जन्मजात जातिभेदाचा उच्छेद करावयाचा म्हणजे या जातीजातीतील मानवी उच्चनीच भावनेचा व तदअनुषंगिक विशिष्टाधिकारंचा तेवढा उच्छेद करायचा' असे मत मांडणारे सावरकर 'हिंदूत्वाचा' मुद्दा मांडतात म्हणून प्रतिगामीही ठरविले जातात.

दुसरीकडे सावरकरभक्तांनी नेहमीच गांधींवर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झाले असे की गांधी मोठे होतेच, ते आणखी मोठे झाले. पण दुर्देवाने त्यामुळे सावरकर उगाचच छोटे ठरविले गेले. समाजातही कट्टर सावरकरभक्त व विरोधक असे दोन गटच तयार झाले. सावरकरभक्तांचा एक गट कायम वेगळाच राहिला. त्यांच्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टीही विकसित झाली. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या पातळीवरही सावरकरांची उपेक्षाच झाली.

सावरकर हे इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंतही होते. १८५७ चा उठाव हा तोपर्यंत बंड ठरवला होता, पण सावरकरांनी हे बंड नव्हते स्वातंत्र्यसमर होते, हे ठासून सांगितले. स्वातंत्र्याची पहिली ज्वाला या घटनेनेच पेटवली, हेही त्यांनी बर्‍याच आधाराने सांगितले. त्यासाठी इतिहासही खोदून काढला.

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments