Publish Date: Sat, 17 Aug 2019 (11:33 IST)
Updated Date: Sat, 17 Aug 2019 (11:36 IST)
महापूर तीन राज्यातील असल्याने संपूर्ण राज्याच्या निवडणुका पुढे ढकलण्याची आवश्यकता नाही, असं राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार कोल्हापुरात म्हणाले.
पूरग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात आचारसंहितेची अडचण येऊ शकते. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्या, अशी मागणी महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र, राज ठाकरे यांची मागणी संयुक्तिक नाही, असंही शरद पवार म्हणाले.
कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यात आलेल्या भीषण पुराची पाहणी करण्यासाठी शरद पवार गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकांबाबत आपली भूमिका मांडली.
त्याचवेळी, "पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वेळ घालवून चालणार नाही. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळं आचारसंहिता लागू होण्याआधीच लवकर निर्णय व्हावेत." असंही पवारांनी नमूद केलं.