इकडील गावाची नावे जरा आपलेच वैशिष्ट्य राखून आहेत. 'इकीयांग', 'इटानगर', कामकी, काम्बुंग, काईंग कांबुक, जीनींग, पेनींग वगैरे वगैरे.
अलाँगला रामकृष्ण मिशनची शाळा आहे. 'रामकृष्ण मिशन स्कूल' हे अलाँगचे भूषण आहे. शाळेत 1000 च्या वर विद्यार्थी शिकतात. पैकी 750 विद्यार्थी शाळेच्या वसतीगृहात राहातात. ही मुले तिथली स्थानिक मुले आहेत. 4/5 वर्षाची मुले आई-वडिलांना सोडून वसतीगृहात राहतात. मागासलेल्या जमातीचा उद्धार करावा म्हणूनच ही शाळा सुरू झाली पण सर्व सुशिक्षत वर्गही आपल्या मुलांना ह्याच शाळेत शिकवितो.
त्यामुळे शाळेत शिस्त वाखडण्याजोगीच आहे. अभ्यासक्रम उच्च प्रतीचा आहे. तिथे रोज रात्री 5.30 वाजता प्रार्थना होते त्यावेळेला वसतीगृहातील विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र जमतात, प्रार्थना हॉलमध्ये सर्व धर्मसंस्थापकांचे मोठे मोठे फोटो लावले आहे. प्रार्थनेच्या वेळेस तबला पेटीचा उपयोग केला जातो. सर्वत्र मंगल मंगल वातावरण निर्माण होते.
इथल्या लोकांचा बांधा रंगरूप साधारण चीन लोकांसारखाच आहे. उंचीने ठेंगणे, रंगाने गोरे, लहान डोळ्याचे आणि चापट चेहेर्याचे असे हे लोक. येथे पुरुषांपेक्षा बायका जास्त कष्टाळू. पाठीला मुल बांधून सतत कामांत दंग असतात. जंगलात जाऊन तिकडला भाजीपाला आणावा आणि उकडून मीठ लावून तो उकडलेल्या तांदळाबरोबर खावा बस! हेच ह्यांच मुख्य खाण. खरं म्हणजे तिथल्या पहाडी जंगलात मसाल्याचे पदार्थ खूप होतात पण त्यांचा वापर करणे ह्यांना माहितच नाही. जंगलात जातांना विळ्या सारखा एक अवजार कमरेला बांधतात त्याला 'दाव' असे म्हणतात. बायका वरून मोठं ब्लाऊज खाली लुंगी आणि डोक्याला कपडा बांधतात. पाठीवर बांबूनेच विणलेली विशिष्ठ पद्धतीची टोपली बांधून त्यांत बरेच ओझे घालून घरी येतात. घरं सारी बांबूचीच! झोपड्याच म्हणाना त्यांना त्या झोपड्यांवर छत असतं जंगलातील मोठमोठ्या पानांचं!
कलाकुसरीची काम बांबूपासूनच जास्त करतात. एक दिवस आम्हाला इंकीयाँगला जाण्याचा योग आला. अलाँगपासून फक्त चार तासाच्या अंतरावर वसलेले हे गांव सुद्धा सियांग नदीच्या काठावरच वसले आहे. नदीच्या काठाकाठानी हिमालयाचा सहारा घेत आम्ही चार वाजता तिथे पोहोचलो. दिवस थंडीचे होते. आम्ही सृष्टिसौंदर्याचा आस्वाद घेत घेत तिथल्या 'सर्कीट हाऊस' मध्ये पोहोचलो, तेव्हां दुपारी चार वाजता संध्याकाळ झाली होती.
सियांग नदीच्या पाण्यांत गावाच्या दिव्याचे प्रतिबिंब पडून चमचम चमकत होते. जणू काही दीपमाळ लावून कोणीतरी विधाता शांतपणे दिवाळीच साजरी करीत होता. नयनमनोहर शांत आणि सुखद अस ते सौंदर्य होते. अशा ह्या सुंदर दृष्याने आमचे स्वागत केले. सर्कीट हाऊसमध्ये आम्ही पोहोचलो आणि केवळ विधात्याचीच नक्कल मानवानी केली की काय अशी शंका आली कारण ते सर्कीट हाऊसही तेवढेच सुंदर सजविलेले होते.
सकाळी कडाक्याच्या थंडीत उठायचं खूप जीवावर आलं होत पण म्हटलं पाहू तरी उठून, पुन्हा थोडंच यायच आहे या गावी. सूर्योदयापूर्वी (किती वाजले होते ते देव जाणे) आम्ही उठलो सर्कीट हाऊसच्या परिसरातच फेरफटका मारावा म्हणून आम्ही खोलीच्या बाहेर पडलो आणि एकदम मनाची पकड घेणारं आणि नेत्रसुख देणारं असं एक कधी न बघितलेल सौंदर्य आमच्या समोर उभ ठाकलं! निळ्या निळ्या आकाशाला भिडणारे उंच उंच पर्वत, त्यांच्या खाली पर्वताची दुसरी रांग उंच जाणार्या पर्वताच्या मागे धावते आहे की काय असा भास होत होता. तिसरी एक रांग पांढर्या शुभ्र धुक्यांची होती.
आकाशाचा निळाशार पर्वचांचा हिरवागार, तर धुक्यांचा पांढराशुभ्र रंग, तीनरंगी रंगानं रंगलेलं हे विश्व पाहून मी हरकून गेले. द्विढ़मुढ होऊन जागच्या जागीच उभी राहिले. तो काय? अरुणाची आभा फाकून हळूहळू त्याचा मंदमंद लालसर पिवळसर प्रकाश दृष्टिवर पडला आणि वाटू लागलं धुक्याची लाट आता आपल्याकडे धाव घेत आहे. आपण आता धुक्यांत सापडू, आपल्याला काही दिसणार नाही, अशी शंका आली पण तस काही झालं नाही. चांदी वितळल्याप्रमाणे धुकं हळूहळू वितळू लागलं आणि वेगळ्याच सौंदर्याचा साक्षात्कार झाला.
धुक्याच्या खाली सियांग नदी मंद शांत स्थिर आणि गंभीरपणे पहुडली होती. तिच्या पाण्याचा रंग शेवाळी होता. वरील तीन रंगात हा चौथा रंग मिसळला आणि खरोखर निसर्गाच्या भव्य दिव्य अशा रूपाचं दर्शन घडलं, हळूहळू अरुणोदय झाला सूर्य दर्शन झाल्यावर खूप खूप बरं वाटलं आल्हाददायक अशा त्या वातावरणातून जडावलेल्या आणि भारावलेल्या मनान आम्ही चहा घेण्यास आमच्या 'सूट'मध्ये परतलो.