Publish Date: Tue, 23 Mar 2021 (08:30 IST)
Updated Date: Tue, 23 Mar 2021 (08:32 IST)
राज्यात सोमवारी 24 हजार 645 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून सध्या 2 लाख 15 हजार 241 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 22 लाख 34 हजार 330 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 19 हजार 463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 टक्के एवढं झाले आहे.
दररोज राज्यात तीन लाख लोकांचं लसीकरण होत आहे. खासगी ठिकाणं वाढवतो आहे व ग्रामीण भागात उपकेंद्रापर्यंत लसीकरणाच्या दृष्टीने लोकांना सुलभता व्हावी, यासाठी आम्ही व्यवस्था करतो आहे. आता 20 बेडेड हॉस्पिटलपर्यंत देखील लसीकरणाची व्यवस्था केली जात आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण संपवायचा. लसीकरणावर आम्ही विशेष लक्ष दिल्याचे राजेश टोपे म्हणाले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या रुग्ण संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. जर कोरोना रुग्ण वाढत असतील, तर काही शहरात लॉकडाउन लावावं लागेल असे ते म्हणाले. आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. लॉकडाउन टाळायचे असेल तर जनतेने नियम पाळायला हवेत. असं आवाहन आरोग्यमंत्री टोपे यांनी जनतेला केलं आहे.