Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

52 दरवाजांचे शहर; औरंगाबाद

Webdunia
सोमवार, 22 जून 2015 (17:39 IST)
आशिया खंडातील 400 वर्षांत सर्वात जास्त वेगाने वाढलेले 52 दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. यातच औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्याने सर्व स्तरावर पायाभूत सुविधा मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
 
ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेचा, शिल्पकलेचा वारसा आणि विविध प्रकारच्या वन आणि वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळींनी गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा होय.
 
जागतिक पातळीवर प्रसिद्ध पावलेले आणि युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेली अजिंठा लेणी, यादव आणि मुघलकालीन इतिहासात गाजलेला दौलताबाद किल्ला आणि बिबी का मकबरा म्हणजे औरंगाबादचे भूषणच. औरंगाबाद शहराच्या विकासाची मुर्हूतमेढ रोवणाऱ्या मलिक अंबरचा सोनेरी महल, पाण्याच्या नियोजनासाठी बांधलेल्या नहरी यांचा उत्तम नमुना असलेली पाणचक्की, शहराच्या डोंगरमाथ्यावरील बौद्ध लेण्या आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले तसेच अनेक शैक्षणिक चळवळींनी गाजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी स्थळे ही पर्यटकांसाठी अभुतपूर्व अनुभव देणारी आहेत.
 
खाम नदीच्या तीरावर वसलेल्या औरंगाबाद शहराचे पूर्वी मलिक अंबरने फतेहपूर असे नामकरण केले होते. मुघल बादशहा औरंगजेबच्या नावावरुन शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले. पैठणी साडी आणि हिमरु शालींसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहूया.

अजिंठा
औरंगाबाद शहरापासून 110 कि.मी. अंतरावर असलेल्या फर्दापूर गावाजवळ सातमाळाच्या डोंगर रांगात कोरलेली अजिंठा लेणी अत्यंत देखणी आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव आहे.
 
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेसारखी आहे. अजिंठा लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. तसेच संपूर्ण जगामध्ये कोणत्याही शिल्पामध्ये रंग भरलेले एकमेव उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी आहे. येथे देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल असते.
 
अजिंठा व्ह्यू पाँईट येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. लेणी पाहण्यासाठी संपूर्ण दिवस लागत असल्यामुळे पर्यटकांनी सकाळच्या वेळी पाहण्यास सुरुवात करणे योग्य.
 
अजिंठा येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे.

वेरुळ
औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीनंतर या इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असलेल्या वेरुळ लेण्यामध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे. अशी ही लेणी देशतील एकमेव लेणी आहे.

पितळखोरा
औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर कन्नड गावाजवळ एका दरीत हा 13 लेण्यांचा समूह आहे. भारतामधील या सर्वात जुन्या लेण्या आहेत. इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील या बौद्ध लेण्यात सुंदर शिल्पे व रंगीत भित्तिचित्रे आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांचे पाटण आहे. तेथील शिवमंदिरात प्रेक्षणीय कलाकुसर आहे. कन्नड येथील मारुती मंदिरात राहूचे मस्तक आकाशात ठोकरणाऱ्या विष्णू भगवंतांची मूर्ती आहे.
 
कसे जाल- येथे जाण्यासाठी औरंगाबाद येथून बस, मोटारगाडीची सुविधा आहे.

गौताळा अभयारण्य
हे अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य होय. औरंगाबाद शहरापासून 75 कि.मी.अंतरावर, कन्नडपासून 5 कि.मी. अंतरावर तर चाळीसगावपासून 20 कि.मी.अंतरावर आहे. औरंगाबाद आणि धुळे यांना जोडणारा राज्य महामार्ग क्र.211 या अभयारण्यातूनच जातो.
 
कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसतात. पुढे गेल्यानंतर चंदनाच्या वनामधून वाहणारा एक नाला दिसतो त्याला चंदन नाला म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट असे रंगीबेरंगी पक्षी दिसतात. त्याचप्रमाणे सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबुल, कोतवाल आणि चंडोल पक्षी दिसतात. पुढे एक मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. या तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. याठिकाणी पूर्वी गवळी लोक रहायचे. त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या. त्यावरून या तलावाला गौताळा हे नाव पडले आणि हेच नाव पुढे अभयारण्यालाही देण्यात आले.
 
गौताळा तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडूलिंब, चिंच या प्रकारचे वृक्ष आहेत. तळ्यात पाणडुब्या, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग न्याहाळता येतो.
 
गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडच्या भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलीकडे मांजरमाळ डोंगर दिसतो. जंगलातले सर्व पाणवठे उन्हाळ्यात आटतात पण नागद तलाव, गराडा आणि निर्भोर या पाणवठ्यातील पाणी टिकून राहते. वन्यजीव उन्हाळ्यात याठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात. 
 
कसे जाल- अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते. येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे.

घृष्णेश्वर मंदिर
१२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे प्राचीन शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात याठिकाणाचे उल्लेख मिळतात.
 
दौलताबाद
औरंगाबादपासून 15 कि.मी अंतरावर व वेरुळजवळच असलेला दौलताबाद किल्ला. पूर्वी देवगिरी किल्ला म्हणून ही ओळखला जात होता. यादव मुहम्मद तुघलकसारख्या इतिहासाची साक्ष घेऊन शत्रूच्या पकडीत कधीही न आलेला किल्ला आजही ताठ मानेने उभा आहे. हा किल्ला जगभरातील गडप्रेमींना आजही आकर्षित करीत आहे.
 
त्याचबरोबर किल्ल्यामध्ये बांधलेले चांदमिनार हे अत्यंत देखणे आहे. जे त्या काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
 
म्हैसमाळ
वेरुळ-खुलताबाद येथून जवळच डोंगरमाथ्यावर वसलेले म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण, हिल स्टेशन म्हणून पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात तर येथे निसर्गाचे रुपडे अनुभवण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते.

बीबी का मकबरा
हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी हिची कबर आहे.
 
औरंगाबाद बसस्थानकापासून अंदाजे दोन किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराज म्युझिअम
औरंगाबाद महानगरपालिकेने स्थापन केलेल्या या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत वस्तु, शस्त्रे, 500 वर्षांपूर्वीचे शुद्ध सामग्री, पैठणी साडी, औरंगजेबाचे हस्तलिखित कुराण प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.
 
सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालय
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सिद्धार्थ उद्यान कुटुंबासाठी विसाव्याचे स्थान बनले आहे. येथे मत्स्यालय, विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांसाठी ट्रॉयट्रेन, विविध प्रकारच्या खेळणी उपलब्ध आहे.
 
 
 
सोनेरी महल
विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल ऐतिहासिक राजवाडा आहे. सध्या या महलाचा उपयोग ग्रंथालय व ऐतिहासिक वस्तुंच्या संग्रहालयाच्या रुपात जतन करण्यात आले. तेथे काही वर्षांपासून वेरुळ-औरंगाबाद महोत्सव आयोजित केला जातो.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास संग्रहालय
या संग्रहालयात मराठा, राजपूत, मुघलकालीन ऐतिहासिक वस्तु, छायाचित्रे, वस्त्रप्रावरणे अत्यंत प्रेक्षणीय आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी