Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज जरांगे पाटील कोण आहेत? मराठा आरक्षण आंदोलनांचा त्यांचा इतिहास काय आहे?

Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (23:15 IST)
SHRIKANTBANGALE/BBC
मनोज जरांगे पाटील हे नाव मागच्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात बहुतेकांना माहिती झालंय.मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु आहे.
 
“आपण सरकारला 4 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी 4 दिवसांमध्ये जीआर घेऊन यावा. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे,” असं जरांगे यांनी म्हटलं आहे.
 
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे आणि रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरंगे यांची भेट घेतली.
 
या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम दिल्याचं म्हटलं.
 
दरम्यान या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी म्हटलं की, "आम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी एक महिन्याचा अवधी जरांगे यांनी दिला पाहिजे. सरकारची उच्चस्तरीय बैठक कालच झाली.
 
दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली त्यामुळे सरकार आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे."
 
गिरीश महाजन यांनी पुढे बोलताना म्हटलं, की हा प्रश्न लवकरच सुटेल पण काही तांत्रिक बाबींमुळे काही दिवस थांबावं लागेल. हा विषय अध्यादेश काढून सुटणार नाही. मराठा समाजाच्या मागणीला सरकारच न्याय देईल.
 
"समिती नेमून तीन महिने झाले आहेत त्यामुळे थोडा वेळ लागतोय. मनोज जरांगे यांना थोडी सबुरी ठेवावी लागेल. जरांगे पाटील यांना आम्ही जास्तवेळ उपोषण करू देणार नाही."
1 सप्टेंबरच्या दुपारी या गावात पोलिस आणि आंदोलक यांच्या संघर्ष झाला होता.
 
त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. अंतरवाली सराटीमध्ये राज्यातील झाडून सगळे प्रमुख राजकीय नेते येऊन गेले.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यसभा खासदार संजय राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, अर्जुन खोतकर आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश होतो.
 
दरम्यान त्यादिवशी झालेल्या हिंसाचाराबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफीही मागितली.
 
पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा प्रयोग करण्यात आला. ही एक दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारे बळाचा वापर करण्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. या घटनेत जखमी झालेल्या निष्पाप नागरिकांचे मी शासनाच्या वतीने क्षमा मागतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (4 सप्टेंबर) पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.
 
ज्या उपोषणाचे एवढे राजकीय पडसाद उमटले, ज्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला ते उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत? त्यांचा राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक इतिहास काय आहे?
 
मनोज जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी
बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यात असणारं मातोरी हे जरांगे पाटील यांचं मूळ गाव. त्या गावात मनोज पाटील यांची छोटी शेती आहे.
 
तिथे जमीन असल्यामुळे ते त्यांची सासरवाडी असलेल्या अंकुशनगर येथे आले. तिथे त्यांची चार एकर जमीन होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी त्यातली दोन एकर जमीन विकल्याची माहिती आहे. गेल्या 12 ते15 वर्षांपासून ते अंबडजवळ असणाऱ्या अंकुशनगर येथे राहतात.
 
जरांगे पाटलांचं बारावीपर्यंत शिक्षण झालेलं असून त्यांनी जालना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं केलेली आहेत.
 
मनोज पाटील यांच्या कुटुंबामध्ये पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील आहेत. सुरुवातीला कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केलं असल्याची माहिती माध्यमांनी दिलेली आहे.
 
यापूर्वी त्यांनी कुठे आंदोलनं केली आहेत?
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार 2014 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केल्या गेलेल्या अनेक आंदोलनांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सहभाग नोंदवला होता.
 
एवढंच नाही तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर देखील अनेक आंदोलनं केलेली होती मात्र त्यांच्या या आंदोलनांना मोठा पाठिंबा मिळालेला दिसला नाही.
 
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून झाल्याचं माध्यमांनी सांगितलंय. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवबा संघटनेची स्थापना केली आणि जालना जिल्ह्यामध्ये या प्रश्नावर मराठा तरुणांना एकत्रित आणण्याचं काम सुरु केलं.
 
नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता.
 
2014मध्ये त्यांनी शहागड ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगरमध्ये काढलेला मोर्चाही गाजला होता.
 
त्यांनी ज्या ज्या गावात आंदोलनं केली त्या त्या गावांमध्ये राहणारे लोक त्या आंदोलनात सहभागी होत असत. 2021मध्ये जालना जिल्ह्यातल्या साष्ट पिंपळगाव या गावात मनोज जरांगे पाटील यांनी तीन महिने ठिय्या आंदोलन केलं होतं.
 
त्याच आंदोलनात त्यांनी सहा दिवस उपोषणही केलं होतं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली होती.
 
साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. वडीकाळ्या आणि भांबेरी या गावात त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती.
 
आंदोलनांना लोकांचा पाठिंबा का मिळतो?
दैनिक लोकसत्ता मध्ये दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील दुष्काळसदृष्य परिस्थितीमुळे देखील या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे.
 
कापूस, सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. शिकलेली मुले शहरात स्पर्धा परीक्षेत गुंतले आहेत किंवा गावातच शेतीमध्येही प्रयोग करुन पाहत आहेत.
 
पण या प्रयत्नांना यश मिळत नाही. त्यामुळे गावोगावी विवाह न झालेल्या शेतकरी तरुणांची संख्या मोठी आहे. या सर्व मुलांना आपले प्रश्न फक्त आरक्षणाच्या माध्यमातूनच सुटू शकतात असं वाटतं आणि त्यामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठी गर्दी जमते असं अनेकांचं मत आहे.
 
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी अंतरवली येथे त्याच्या काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केले होते.
 
आंदोलकांच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे अनेकांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. पण ते उपोषणावर ठाम होते. या आंदोलनात अनेक गावकरी आणि संघटना सहभागी झाले होते.
 
उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली.
 
पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर पोलिसांवरही दगडफेक केल्याचे आरोप आंदोलकांवर लावण्यात आले.
 
आंदोलनाविषयी विचारल्यावर जरांगे म्हणाले, “3 महिन्यात मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण देऊ, असं सरकारनं आश्वासन दिलं होतं. 3 महिने उलटून गेले पण आरक्षणासाठीच्या समितीनं काही काम केलं नाही. आरक्षण घेईपर्यंत आम्ही हलणार नाही.”
 
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी लाठी चार्जनंतर अंतरवाली सराटी गावाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांना 1 सप्टेंबरच्या घटनेबद्दल विचारलं होतं.
 
त्यांनी सांगितलं, “सरकारकडून आमच्यावर खूप मोठा हल्ला करण्यात आला. गोळीबार करण्यात आला. आमच्या गावातले खूप लोक त्यात जखमी झाले. आमच्या लोकांची डोकी फोडून त्यांना काय मिळालं माहिती नाही. आमचं आंदोलन ते मोडीत करायला निघाले, पण आज महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आमच्या पाठीशी उभा राहिलाय.”
 
पण, गावकऱ्यांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं म्हटलं जात आहे, असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं, “लोकांनी पोलिसांना हाणलं असं गृहमंत्री सांगत आहेत. पण पोलिसांनी आमचे लोक दांड्याखाली तुडवलेत.”
 
मराठा आरक्षणाचा अध्यादेश हवा, गावकऱ्यांवरील पोलिस केसेस माघारी घेतल्या पाहिजेत आणि गावात आलेले सगळे पोलिस कर्मचारी बडतर्फ केले पाहिजे, या 3 प्रमुख मागण्यांसह मराठा आरक्षणासाठीचं उपोषण सुरुच ठेवणार असल्याचंही जरांगे यांनी तेव्हा म्हटलं होतं.
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुण्यात झिका व्हायरसचा पाचवा रुग्ण आढळला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते हिंसा करतात, राहुल गांधींच्या वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ

भुशी डॅम: पावसाळ्यात ट्रेकिंगला, फिरायला जाताना 'ही' काळजी घ्या, वाचा महत्त्वाच्या टिप्स

स्टारलायनरमधून 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले अंतराळवीर अजून का परतले नाहीत?

सर्व पहा

नवीन

IND vs SA: भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा 10 गडी राखून पराभव केला

आजपासून नवीन फौजदारी कायदे लागू, आता घरी बसल्या एफआयआर नोंदवू शकणार

पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात फूट पडण्याची शक्यता बळावली

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबत पुढील तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येणार: अजित पवार यांचे आश्वासन

पुढील लेख
Show comments