शाळा हि केवळ शैक्षणिक अभ्यासापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यामधील सामाजिक तसेच अंगीभूत कलागुणांना वाव देणारी असावी ह्या उद्देश्याने शाळेत नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, लेखक निर्माण व्हावेत ह्या साठी २५ वर्षांपूर्वी उत्कर्ष मंदिर-मालाड तर्फे म्हणजेच शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आंतरशालेय एकांकिका स्पर्धेची सुरूवात झाली होती. यंदा स्पर्धेचे हे २६ वे वर्ष असून शिक्षण प्रसारक मंडळाच्या हिरक महोत्सवानिमित्त हि स्पर्धा नव्या जोशात साजरी होणार आहे. येत्या ८ व ९ सप्टेंबर २०१५ ला सकाळी ९ ते दुपारी २ ह्या वेळेत हि स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ह्या स्पर्धेत जवळपास ८ शाळांनी सहभाग घेतला आहे.
या वेगवेगळ्या धाटणीच्या एकांकिकांचा अनुभव स्पर्धेत अनुभवता येणार आहे. सदर स्पर्धेत परीक्षक म्हणून दशरथ हातिसकर, अभिजीत केळकर आणि भालचंद्र झा हे मान्यवर काम पाहणार असून ९ सप्टेंबर रोजी होणा-या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रसिद्ध मालिका दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान ह्यांची उपस्थिती लाभणार आहे. माजी विद्यार्थ्यांना तसेच नाट्य रसिकांना स्पर्धा तिकिटे शाळेत तसेच नाट्यगृहात उपलब्ध होतील. स्पर्धेची सुरुवात लेखक-दिग्दर्शक अशोक पाटोळे आणि सुनील लेंभे ह्यांच्या 'गोष्ट एका गावाची' ह्या मंगेश विद्यालयाच्या एकांकिकेने होणार असल्याने स्पर्धा नेहमी प्रमाणे चुरशीची होईल तसेच प्रत्येक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा अजूनच रंगतदार होणार असा अंदाज आहे.