Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भरत गण ते भारत : आपल्या देशाचं नाव ‘भारत’ कसं पडलं?

Webdunia
बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (15:12 IST)
G-20 शिखर परिषदेच्या निमित्तानं भारताच्या राष्ट्रपतींनी दिलेल्या निमंत्रण पत्रांवरून वाद निर्माण झाला आहे.
राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रणपत्रात 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' या नेहमी वापरल्या जाणार्‍या शब्दाऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' लिहिल्यानं वाद निर्माण झाला.
 
केंद्र सरकार देशाच्या नावांप्रमाणं 'इंडिया' हा शब्द वापरणं बंद करून आता केवळ 'भारत' म्हणण्याचा डाव आखत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
 
विरोधी पक्षांच्या या आरोपांवर केंद्र सरकार किंवा राष्ट्रपती कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी त्यांचं निमंत्रण पत्र X (ट्विटर) वर टाकलं ज्यामध्ये 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असं लिहिलेलं आहे.
त्यावर काँग्रेस पक्षानं टीका करताना म्हटलं आहे की, "राष्ट्रपतींनी जी-20 परिषदेसाठी पाहुण्यांना पाठवलेल्या निमंत्रण पत्रामध्ये 'प्रेसिडेंट ऑफ इंडिया' ऐवजी 'प्रेसिडेंट ऑफ भारत' हा शब्द वापरण्यात आला आहे. 'इंडिया' आघाडीची इतकी भीती? हा मोदी सरकारचा विरोधकांबद्दलचा द्वेष आहे की घाबरलेल्या हुकूमशहाचा लहरीपणा?"
 
हे निमंत्रणपत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे विरोधी पक्ष हे 'इंडिया' आघाडीला भाजप घाबरत असल्याचा आरोप करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणतात की 'भारत' हे नाव संविधानाचा भाग असल्यानं वापरण्यात काही गैर नाही.
 
भारत हे नाव कसं पडलं?
देशाचं नाव बदलण्यावरून वाद सुरू आहेत, राज्यघटनेत लिहिलेलं ''India, that is Bharat'' बदलून फक्त भारत करण्याची मागणी होत आहे. भारताला किती वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं आणि त्यामागील कथा काय आहे? ते जाणून घेऊया.
 
प्राचीन काळापासून भारताला जंबुद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष , भारतवर्ष, आर्यवर्त, हिंद, हिंदुस्थान आणि इंडिया अशी वेगवेगळी नावं आहेत. परंतु यापैकी भारत हे सर्वाधिक लोकमान्य आणि प्रचलित आहे.
नामकरणाबाबत बहुतेक गृहीतकं आणि मतभेदही केवळ भारताशी संबंधित आहेत. भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीप्रमाणेच त्याची वेगवेगळी नावंही वेगवेगळ्या कालखंडात आढळतात.
 
या नावांतून कधी भूगोल उदयास येतो, कधी जातींची अस्मिता तर कधी संस्कृती.
 
हिंद, हिंदुस्थान, इंडिया अशा नावांनी भूगोल उदयास येत आहे. या नावांच्या मुळांमध्ये सिंधू नदी ठळकपणे दिसते, परंतु सिंधू ही केवळ एका विशिष्ट प्रदेशाची नदी नाही.
 
सिंधू म्हणजे नदी तसंच त्याचा दुसरा अर्थ महासागरसुद्धा आहे. त्या अर्थाने देशाच्या वायव्य प्रदेशाला एके काळी सप्तसिंधू किंवा पंजाब म्हटलं जायचं, त्यामुळं इथं वाहणारे सात किंवा पाच प्रमुख प्रवाह असलेले एक विस्तीर्ण सुपीक क्षेत्र ओळखणं ही बाब आहे.
 
त्याचप्रमाणे, भारत या नावामागे सप्तसैंधव प्रदेशात विकसित झालेल्या अग्निहोत्र संस्कृतीची (अग्नीमध्ये आहुती देणं) ओळख आहे.
 
पौराणिक कालखंडात भरत नावाचे अनेक राजे झाले
पौराणिक कालखंडात भरत नावाचे अनेक राजे झाले आहेत. दुष्यंतसुता व्यतिरिक्त, दशरथचा मुलगा भरत देखील प्रसिद्ध आहे ज्याने पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केलं.
 
नाटककार असलेले भरतमुनी आहेत. एका राजर्षी भरताचाही उल्लेख आहे, ज्यांच्या नावानं हिंदीत 'जडभरत' हा वाक्प्रचार प्रसिद्ध झाला.
 
मगध राजा इंद्रद्युम्नच्या दरबारात भरत ऋषी होते. एक योगी भरत होऊन गेले. पद्मपुराणात दुराचारी ब्राह्मण भरताचा उल्लेख आहे.
 
'ऐतरेय ब्राह्मण'मध्ये दुष्यंतचा मुलगा भरत याच्या नावावरून भारत नाव आलं. ग्रंथानुसार, भरत हा चक्रवर्ती सम्राट होता, म्हणजे चारही दिशांची भूमी जिंकून आणि प्रचंड साम्राज्य उभारल्यानंतर त्यानं अश्वमेध यज्ञ केला, त्यामुळं त्याच्या राज्याला भारतवर्ष हे नाव पडलं.
 
तसंच मत्स्य पुराणात असा उल्लेख आहे की मनुनेच लोकांना जन्म दिला आणि त्यांचं भरण-पोषण केलं म्हणून त्याला भरत म्हटलं गेलं. त्यानं ज्या प्रदेशावर राज्य केलं त्याला भारतवर्ष असं म्हणतात.
 
जैन परंपरेत नामकरणाची सूत्रं आढळतात. भगवान ऋषभदेव यांचे ज्येष्ठ पुत्र महायोगी भरत यांच्या नावावरून या देशाचे नाव भारतवर्ष ठेवण्यात आलं. संस्कृतमध्ये वर्ष म्हणजे प्रांत,विभागणी,भाग इ.
 
दुष्यंत-शकुंतला पुत्र भरत
महाभारताच्या आदिपर्वात भारत या नावामागे एक कथा आहे. महर्षी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका यांची कन्या शकुंतला आणि पुरुवंशी राजा दुष्यंत यांच्यात गांधर्व विवाह झाला होता. या दोघांच्या मुलाचं नाव भरत होतं.
 
कण्व ऋषींनी आशीर्वाद दिला की भरत पुढे चक्रवर्ती सम्राट होईल आणि या भूखंडाचं नाव भारत म्हणून प्रसिद्ध होईल.
 
भारत नावाच्या उत्पत्तीची ही प्रेमकथा बहुतेक लोकांच्या मनात लोकप्रिय आहे. आदिपर्वात या घटनेवर कालिदासांनी अभिज्ञानशाकुन्तलम् नावाचं महाकाव्य रचलं. मुळात ही एक प्रेमकथा आहे आणि त्यामुळेच ही कथा लोकप्रिय झाल्याचं मानलं जातं.
 
दोन प्रेमिकांच्या अमर प्रेमाची कहाणी इतकी महत्त्वाची ठरली की शकुंतला-दुष्यंत पुत्र, म्हणजे महाप्रतापी भरत, ज्याचं नाव या महादेशाला दिलं, त्याच्या बद्दल इतर गोष्टी माहित नाहीत.
 
दुष्यंतपुत्र भरत पूर्वी 'भरत जन' या देशात होते, असं इतिहासाच्या अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे भारताचं नाव कोणा एका विशिष्ट व्यक्तीच्या नावानं नव्हे तर जाती-समूहाच्या नावानं लोकप्रिय झालं हे तर्कसंगत आहे.
 
भरत गण ते भारत
भारतातील लोक अग्निपूजक, अग्निहोत्र आणि यज्ञप्रेमी होते. वैदिक साहित्यात, भरत/भरथ म्हणजे अग्नि, लोकपाल किंवा विश्वरक्षक (मोनियर विल्यम्स संस्कृत- इंग्लिश डिक्शनरी) आणि एका राजाचं नाव आहे.
 
हा राजा तोच 'भरत' आहे जो सरस्वती, घग्गरच्या काठावर राज्य करत असे. संस्कृतमधील 'भर' या शब्दाचा एक अर्थ युद्ध असा आहे.
दुसरा अर्थ 'समूह' किंवा ' 'जन-गण' आणि तिसरा अर्थ 'निर्वाह'.
 
प्रख्यात भाषातज्ज्ञ डॉ. रामविलास शर्मा सांगतात, "हे अर्थ वेगवेगळे आणि एकमेकांच्या विरोधाभासी वाटतात. त्यामुळे जर भर म्हणजे युद्ध आणि उदरनिर्वाह असा दोन्ही अर्थ असेल, तर या शब्दाला स्वतःचं वेगळेपण नाही. 'भर' या शब्दाचा मूळ अर्थ आहे 'गण' म्हणजेच 'जन' होतं.
 
गण प्रमाणेच, तो कोणत्याही 'जन'साठी वापरता येऊ शकते. तसेच तो त्या विशेष गणाचा सूचक होता जो 'भारत' नावानं प्रसिद्ध झाला होता."
 
याचा अर्थ काय?
खरंतर, भरताची कथा आर्य इतिहासात इतकी प्राचीन आणि दूरची आहे की कधी कधी युद्ध, अग्नि, संघ इत्यादी अर्थांशी निगडीत असलेल्या 'भरत' चा अर्थ एका संज्ञेपुरता मर्यादीत राहिला.
ज्याचा उल्लेख कधी 'दाशरथेय भरत' करायचे. तर भारत शब्दाच्या उत्पत्तीच्या संदर्भ जेव्हा दुष्यंतपुत्र भरतशी जोडला जातो, तेव्हा त्याचं नाव घेतलं जातं.
 
'भारती' आणि 'सरस्वती' यांचं भरतांशी नातं
परंतु हजारो वर्षांपूर्वी अग्नीप्रेमी भरतांची पवित्रता आणि सदाचार इतके वाढले होते की, सतत यज्ञ केल्यानं भारत आणि अग्नि हे शब्द एकमेकांशी जोडले गेले.
 
जणू काही भरत आणि भारत हे शब्द अग्नीचे विशेषण बनली आहेत.
 
संदर्भावरून असं दिसून येते की देवश्रवा आणि देववात या भरताच्या दोन ऋषींनी म्हणजेच भरतजनांनी मंथनातून अग्नी प्रज्वलित करण्याचं तंत्र शोधून काढलं.
 
डॉ. रामविलास शर्मा यांच्या मते, ऋग्वेदातील कवींना भरतांच्या अग्नीशी असलेल्या ऐतिहासिक परंपरेची जाणीव आहे.
 
भरतांच्या सततच्या सहवासामुळं अग्नीला भारत म्हटलं गेलं. तसंच यज्ञात सतत काव्य पठण होतं असल्यामुळे कवींच्या वाणीला भारती म्हणत.
 
हे काव्यवाचन सरस्वतीच्या तीरावर झालं, त्यामुळं हे नाव कवींच्या वाणीशी जोडलं गेलं.
 
अनेक वैदिक मंत्रांमध्ये भारती आणि सरस्वतीचा उल्लेख आढळतो.
 
दहा राजांची लढाई
प्राचीन ग्रंथांमध्ये, वैदिक काळातील भरत या प्रसिद्ध जातीचं नाव अनेक संदर्भात आढळतं. सरस्वती नदीच्या किंवा आजच्या घग्गरच्या काठी स्थायिक झालेला हा समूह होता. तो यज्ञ प्रिय अग्निहोत्र पुरुष होता.
 
या भारतजनाच्या नावावरून त्या काळातील संपूर्ण भूमीला भारतवर्ष हे नाव पडलं. जाणकारांच्या मते सुदास हा भरत जातीचा प्रमुख होता.
 
वैदिक काळापूर्वी वायव्य भारतात लोकांचे अनेक समूह राहत होते. त्यांना 'जन' असं म्हणतात.
 
अशा प्रकारे भरताचा हा संघ 'भरत जन' या नावानं ओळखला जात असे. बाकीचे आर्य संघ देखील अनेक गटांमध्ये विभागले गेले होते, त्यापैकी पुरू, यदु, तुर्वसु,अनु, द्रुह्यु, गंधार, विषाणिनी, पक्थ, केकय , शिव, अलिन, भलान, त्रित्सु आणि संजय इत्यादी गट समूह हे 'जन' होते.
 
यापैकी दहा लोकांशी सुदास आणि त्यांच्या त्रित्सू कुळाचं युद्ध झालं.
 
गण किंवा दहा प्रमुख जातींचे जन सुदासांच्या त्रित्सू कुळाविरुद्ध लढत होते, त्यापैकी पंचजन (ज्याला अविभाजित पंजाब असं समजलं जाऊ शकतं) म्हणजे पुरू, यदू, तुर्वसू, अनु आणि द्रुह्यू, भालनस (बोलान खिंडीचं क्षेत्र) या व्यतिरिक्त, अलिन. (काफिरिस्तान), शिव (सिंध), पक्थ (पश्तुन) आणि विषाणिनी जमातींचा समावेश होता.
 
महाभारताच्या अडीच हजार वर्षांपूर्वीचा 'भारत'
हे महायुद्ध महाभारताच्या अडीच हजार वर्षांपूर्वी झालं असं म्हणतात. ही साधी गोष्ट आहे की ज्याचं नावच महा'भारत' युद्ध आहे ते कधी झालं असेलं?
 
इतिहासकारांच्या मते ख्रिस्तपूर्व सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी कौरव आणि पांडवांमध्ये मोठे युद्ध झालं होतं.
 
गृहकलहाचं महायुद्धात रूपांतर झालं हे ठीक आहे, पण या देशाचं नाव भारत आहे आणि दोन कुटुंबांमधील निर्णायक लढाईत देशाचं नाव का आलं?
 
याचं कारण म्हणजे भारताच्या भौगोलिक सीमेत येणाऱ्या जवळपास सर्वच राज्यांनी या युद्धात भाग घेतला म्हणून त्याला महाभारत म्हणतात.
 
दाशराज्ञ युद्ध हे याच्याही आधी अडीच हजार वर्षांपूर्वी झालं असं म्हणतात. म्हणजे साडेसात हजार वर्षांपूर्वी.
 
यामध्ये तृत्सु जातीच्या लोकांनी दहा राज्यांच्या संघावर अभूतपूर्व विजय मिळवला. तृत्सु लोकांना भरतांचा संघ असं म्हणतात. या युद्धापूर्वी हा परिसर अनेक नावांनी प्रसिद्ध होता.
 
या विजयानंतर तत्कालीन आर्यावर्तात भरतांचे वर्चस्व वाढले आणि तत्कालीन जनपदांच्या महासंघाला भारत म्हणजेच भरतांचं नाव पडलं.
 
भारत-इराण संस्कृती
महाभारतात शकुंतला पुत्र महाप्रतापी भरत याच्या उल्लेखानं एक रंजक घटना आहे.
 
आता हिंद, हिंदुस्थान बद्दल बोलूया. इराणी-हिंदुस्थानी जुने संबंध होते. इराण पूर्वी फारस होता. त्याआधीही आर्यमन, आर्या किंवा आर्यान. अवेस्तामध्ये या नावांचा उल्लेख आहे.
 
हिंदूकुशच्या पलीकडे असलेल्या आर्यांच्या संघ हा इराण आणि पूर्वेकडे असलेल्या आर्यांच्या संघ हा आर्यवर्त असे म्हणत. हे दोन्ही गट महान होते. प्रभावी होते.
 
खरे तर खुद्द इराणींनी भारताचं नाव दूर पश्चिमेला पोहोचवलं. कुर्दीश सीमेवरील बेहिस्तुन शिलालेखावर कोरलेला हिंदूश हा शब्द याची साक्ष देतो.
 
फारसी देखील अरबी शिकले, परंतु त्यांच्या स्वत:च्या शैलीत.
 
एके काळी अग्नीपूजा करणाऱ्या झोरास्ट्रियन लोकांची लोकसंख्या इतकी होती की तिथे इस्लामचा उदय होऊ शकला नसता. या गोष्टी इस्लामच्या शतकापूर्वीच्या आणि येशू ख्रिस्ताच्या चार शतकांपूर्वीच्या आहेत.
 
संस्कृत आणि अवेस्ता (फारस प्रदेशातील भाषा) मध्ये एक नाळ जोडलेली आहे. हिंदुकुश-बामियानच्या या बाजूनं यज्ञ होयचा, तर दुसऱ्या बाजूला यश्न. आर्यमन, अथर्वन, होम, सोम, हवन असे समानार्थी शब्द प्रयोग इथं होते तसे तिथंही होते.
 
फारस, फारसी आणि फारसिंच्या स्वीकाराची व्याप्ती एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर इस्लामच्या कार्यक्षेत्रातही सनातनचं हे सामंजस्य दिसून येतं.
 
हिंद, हिंदश, हिंदवान
हिंदू हा शब्द अक्कादी संस्कृतीत ख्रिस्तापूर्वी दोन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होता.
 
अक्कद, सुमेर आणि इजिप्तशी भारताचे संबंध होते. हे हडप्पा काळातील आहे.
 
सिंध ही केवळ एक नदी नव्हती तर ती महासागर, प्रवाह आणि पाणी यांचा समानार्थी शब्द होता.
 
सात नद्या असलेल्या सिंधमधील प्रसिद्ध 'सप्तसिंध', 'सप्तसिंधू' प्रदेशाला प्राचीन फारसी भाषेत 'हफ्तहिंदू' असे म्हणतात.
या 'हिंदू'चा काही वेगळा अर्थ आहे का ?
अर्थात हिंद, हिंदू, हिंदवान, हिंदुश अशा अनेक संज्ञा फार प्राचीन आहेत.
 
इंडस हा याच हिंदश शब्दाच ग्रीक समरूप आहे. या गोष्टी इस्लामच्या शतकापूर्वीच्या आहेत.
 
ग्रीक भाषेत भारतासाठी India किंवा सिंधूसाठी Indus हे शब्द वापरणं हा खरं तर याचा पुरावा आहे की हिंद हा अतिशय प्राचीन शब्द असून ती भारताची ओळख आहे. संस्कृत मधील 'स्थान' फारसीमध्ये 'स्तान' होतं.
 
अशा रीतीने हिंदसोबत मिळून हिंदुस्थान निर्माण झाला. म्हणजे जिथं हिंदी लोक राहतात.
 
भारत-युरोपियन भाषांमध्ये 'ह' चं रूपांतर 'अ' होतं. 'स' चं 'अ' होत नाही.
 
मेसोपोटेमिया संस्कृतीचा फक्त हिंदूंशी संपर्क होता. हिंदू हा खरं तर ग्रीक इंडस, अरब, अक्काद, पर्शियन संबंधाचा परिणाम आहे.
 
आम्ही 'भारतीय' आहोत
'इंडिका'चा वापर मेगास्थनीजनं केला होता. पाटलीपुत्रातही तो बराच काळ राहिला परंतु तेथे पोहोचण्यापूर्वी तो बख्त्र, बाख्त्री (बॅक्ट्रिया), गांधार, तक्षशिला (टेक्सला) या प्रदेशांतून गेला.
 
हिंद, हिंदवान, हिंदू असे शब्द इथं प्रचलित होते.
 
ग्रीक स्वरतंत्रानुसार त्यांनी इंडस, इंडिया अशी रूपं धारण केली. हे ख्रिस्तपूर्व तीन शतकं आणि मोहम्मदच्या 10 शतकांपूर्वी आहे.
 
जंबूद्वीप हे सर्वात जुनं नाव आहे. जो आजच्या भारत, आर्यवर्त, भारतवर्ष पेक्षा मोठा होता.
 
परंतु या सर्वांसाठी खूप तपशील आवश्यक आहेत आणि त्याबाबत सखोल संशोधन अद्याप सूरू आहे.
 
जांभूळ फळाला संस्कृतमध्ये 'जम्बु' म्हणतात. एकेकाळी या मध्यवर्ती भूमीत म्हणजे भारतामध्ये जांभळाची झाडं भरपूर होती असे अनेक उल्लेख आहेत. या कारणास्तव याला 'जंबूद्वीप' असं म्हणतात.
 
काहीही असो, आपली चेतना जंबूद्वीपशी नाही तर भारत नावाशी जोडलेली आहे. 'भरत' या नावातच सर्व भारताची कथा कोरलेली आहे.






Published By- Priya Dixit
 
 
 
 

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments