हिंदू लोक नेहमीच आपल्या देशाच्या चारी भितींच्या आत युगानुयुगे राहत आले आहेत, असे तुमच्यापैकी ज्यांना वाटते ते मोठी चूक करीत आहेत. तुम्हाला असे वाटत असेल तर, तुम्ही आपल्या प्रचीन शास्त्रांचे अध्ययन केले नाही, तुम्ही आपल्या इतिहासाचा सम्यक अभ्यास केला नाही असे म्हणावे लागेल.
ज्या देशाला जिवंत राहावयाचे असेल त्याने इतर देशांना काही ना काही दिलेच पाहिजे. जीवन दिल्याने जीवन प्राप्त होत असते. तुम्हाला एखादी गोष्ट प्राप्त होते तेव्हा तुम्ही इतरांना काहीतरी देऊन तिचे मूल्य चुकविले पाहीजे. आपण कित्येक सहस्त्र वर्षे जिवंत आहोत ही गोष्ट आपण अमान्य करू शकत नाही, याचे एकच कारण हे की आपण बाहेरील जगाला सदैव काहीतरी देत आलो आहोत, मग अज्ञ लोक काहीही समजोत. पण भारताने जगाला दिलेली देणगी ही धर्म, तत्त्वज्ञान व आध्यात्मिकता याचीच आहे. आणि धर्माला आपल्या प्रसाराचा मार्ग मोकळा करण्यासाठी आघाडीवर सैन्य असण्याची आवश्यकता नाही, ज्ञान व तत्त्वज्ञान यांना दुसरीकडे जाण्यासाठी रक्ताचे पाट वाहवावे लागत नाहीत. ज्ञान व तत्त्वज्ञान ही रक्ताळलेली मानवी शरीरे तुडवीत व हिंसा करीत एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जात नसून प्रेम व शांती साहाय्याने ती संक्रमित होत असतात, आणि नेहमीच असे घडत आले आहे. याप्रमाणे आपल्याला नेहमीच द्यावे लागले आहे.
लंडनमधे एका तरूण स्त्रीने मला विचारले, ''तुम्ही हिंदू लोकांनी काय केले आहे? तुम्ही कधीही एक देशसुध्दा जिंकला नाही.'' शूर, साहसी, क्षत्रिय इंग्रजांच्या दृष्टीकोनातून हे सर्व बरोबर आहे, एखाद्या मनुष्याने दुसर्यावर विजय मिळविणे हेच त्यांच्या दृष्टीने गौरवास्पद कार्य आहे. त्यांच्या दृष्टीने हेच ठीक आहे. पण आमच्या दृष्टीकोनातून ते अगदी चुकीचे आहे. भारताच्या महत्तेचे कारण कोणते, असे मी स्वत:स विचारले तर उत्तर येईल की आपण कधीही कोणाला जिंकले नाही हेच आपल्या महत्तेचे कारण आहे. त्यातच आपला गौरव आहे. आपला धर्म जयिष्णू नाही अशी निंदा तुम्ही प्रतिदिनी ऐकता आणि मला खेद वाटतो की ज्यांना अधिक कळावयास हवे असे लोकही कधीकधी अशी निंदा करताना आढळतात. मला वाटते की नेमका हाच युक्तीवाद, आपला धर्म अन्य कोणत्याही धर्मापेक्षा अधिक सत्य आहे हे सिध्द करण्याकरिता योग्य ठरेल. आपल्या धर्माने दुसर्याला कधीही जिंकले नाही. कधी रक्तपात केला नाही, उलट त्याने सर्वांवर आशीर्वचनांचा, शांततेच्या, प्रेमाच्या व सहानुभूतीच्या शब्दांचाच नेहमी वर्षाव केलेला आहे.
या भूमीत, आणि केवळ याच भूमीत परमतसहिष्णुतेच्या आदर्शाचा प्रथम प्रचार काला गेला आणि केवळ याच ठिकाणी सहानुभूती व परमतसहिष्णुता प्रत्यक्ष व्यवहारात उतरल्या. अन्य सर्व देशांत त्या केवळ सिध्दांतातच आढळतात. केवळ याच भूमीत हिंदूंनी मुसलमानांकरिता मशीदी बांधल्या आणि ख्रिस्ती लोकांकरिता प्रार्थनामंदिरे बांधून दिली.
याप्रमाणे तुम्ही हे पाहिले की आपला संदेश कितीदा तरी जगाला प्राप्त झाला, परंतू तो अगदी शांतपणे, हळुवारपणे व नकळत दिला गेला आहे. सर्वच बाबतीत भारताची कार्यपध्दती अशीच आहे. भारतीय विचारसरणीचे वैशिष्ट्य हेच आहे की ती मूक व शांत आहे. ह्याबरोबरच तिच्यात विलक्षण शक्ती असूनही ती हिंसेमधून कधीही व्यक्त होत नाही.