मला मुलांना सगळी नाती मिळवून द्यायची आहेत. त्यासाठी काही गोष्टी अँडजेस्ट कराव्या लागतात. प्रसंगी तुम्हाला प्रायोरिटी बदलाव्या लागतात पण त्यातून मिळणारं समाधान मोठं आहे. मी वेळी अवेळी घराबाहेर पडले तरी घरात मुलांनी जेवण केलं असेल का किंवा त्यांचा अभ्यास झाला असेल का अशी काळजी मला करावी लागत नाही कारण घरात त्यांची आजी, काकू, काका अशी सगळी माणसं आहेत.’
ही परिस्थिती आपली होऊ नये याची काळजी मी घेतो. कारण कितीही मतभेद झाले तरी आई-वडिलांची काळजी ही वाटतेच. त्यांनाही भरल्या घरात राहण्यासारखं सुख नाही. त्यामुळे मी एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या बायकोने त्याला पूर्ण साथ दिली त्यामुळे आज माझ्या मुलांना आजी-आजोबांचं प्रेम मिळतंय.’
आज पुन्हा एकदा नवी पिढी एकत्र कुटुंबाला प्राधान्य देताना दिसतेय. कारणं काहीही असली तरी त्यांना या परस्पर जिव्हाळ्याची ओढ वाटतेय. ते पार कसं पाडायचं हा विचार आता त्यांनी करायला हवा. आजवर स्वतंत्र शैलीत राहण्याची सवय झाली असेल तर आपल्या मतांना थोडी मुरड घालायची आणि परिस्थिती सांभाळून घ्यायचं कौशल्य त्यांनी दाखवायला हवंय. एकत्र कुटुंबात राहताना काही गोष्टी टाळल्या तर हा सहवास अधिक सुखकारक होऊ शकतो. मोठय़ांचं म्हणणं एकदम खोडून काढू नका. काही गोष्टी पटल्या नसतील तरी एकदम नकाराचा सूर लावू नका. प्रश्न मांडल्याने सुटतील यावर विश्वास ठेवा. कोणतीही समस्या समोरासमोर बसून सोडवली तर चांगली सुटते.
मोठय़ांचा आदर तुम्ही करायला शिका आणि मुलांना करायला शिकवा म्हणजेच मुलंही मोठी झाल्यावर तुम्हाला आदर देतील. घरात कितीही मतभेद झाले तरी ते चार भिंतीत राहू द्या. काही चुका झाल्या तरी तत्काळ आरोप करू नका. शहानिशा करून विचार विनिमय करा. दोष दिल्याने नाती तुटतात. एकत्र कुटुंबात राहण्याचा निर्णय घेत असाल तर या गोष्टींवरही एकदा विचार करा. म्हणजे या मार्गातले खाचखळगे पार करणं सोपं जाईल!