छत्तीसगडमधील कवर्धा येथील दोनदिवसीय धर्म संसदेत मंदिरांतून साई बाबांची मूर्ती हटवण्याचा कोणताही प्रस्ताव पारित झालेला नसल्याचे जनसंपर्क अधिकारी राजेश जोशी यांनी स्पष्ट केले आहे. धर्म संसदेतील निर्णयावरून समाजात अफवा पससरवण्याचे काम सुरु असल्याचेही जोशी म्हणाले.
संसदेतील पारित करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार मंदिरांतील मूर्ती हटवण्याची तयारी सुरु करण्यात आलेल्याचे वृत्त आहे. छत्तीसगडचे गृहमंत्री रामसेवक पैकरा यांनीही सर्वांना आपल्या श्रद्धेनुसार धर्मपालनाची मुभा असल्याचे स्पष्ट केले. मंदिरांतून साईमूर्ती हटवण्यात येणार नाहीत, असेही मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर जोशी यांना स्पष्टीकरण द्यावे लागले.
जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपत्यहीन हिंदू पतींना दुसर्या विवाहाचा अधिकार देण्यासाठ हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय धर्म संसदेत एकूण सहा प्रस्ताव पारित करण्यात आले आहेत.
शिर्डीचे साई गुरू, संत वा देवाचे अवतार नाहीत, गोहत्येवर संपूर्ण देशात बंदी घालण्यात यावी, गंगेचा प्रवाह निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न व्हावा, शालेय अभ्यासक्रमांत गीता व रामायण शिकवा, रामाच्या जन्मभूमीवर अयोध्येत मंदिर उभारावे आणि भोंदू साधू-संतांवर बहिष्कार टाकावा असे सहा प्रस्ताव पारित करण्यात आल्याची माहिती राजेश जोशी यांनी यावेळी दिली.