महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण काही कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्र गेल्या काही दिवसांमध्ये अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.यामध्ये अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तर मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही नेत्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. त्यांची राज्यसभेची खासदारकी जवळपास निश्चित आहे.
तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. हा धक्का पक्ष पचवत नाही तोच आणखी एक धक्का काँग्रेसला पडला. काँग्रेसमधील आणखी एक दिग्गज नेता पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजते.
काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बसवराज पाटील हे काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. पण त्यांनी आता कार्यध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
ते उद्या सकाळी 11 वाजता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. बसवराज पाटील यांचं धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर या भागात प्राबल्य आहे.