Publish Date: Thu, 06 Oct 2022 (14:38 IST)
Updated Date: Thu, 06 Oct 2022 (14:40 IST)
दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मीडियाशी बोलताना खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, खरी शिवसेना कोणती, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिल्याचंही ते म्हणाले.
“ज्या प्रमाणात लोक बीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले ते पाहाता काल एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे. पण तरीही तिथे तुडुंब गर्दी होती. महाराष्ट्रभरातून लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, हे कालच्या मेळाव्यात प्रस्थापित केलं आहे. यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो”, असं फडणवीस म्हणाले.
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना…”
एकनाथ शिंदेंनी विकासाच्या मुद्द्यांना हात घातला असं म्हणत फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या आधीच्या भाषणांची तुलना केली आहे. “आम्ही काय करतोय, काय करणार आहे हे एकनाथ शिंदेंनी भाषणात सांगितलं. मागच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे होत नव्हतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते पक्षप्रमुखाचंच भाषण करायचे. त्यांनी एकही भाषण मुख्यमंत्र्याचं केलं नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Edited by: Ratnadeep Ranshoor