भाजपमध्ये सहनशील आणि शांत विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे आपणंही तसं दाखवायला पाहिजे म्हणून मी शांत आहे, भाजपात आलो ही माझी अडचण आहे, पण याचा कुणी फायदा घेऊ नका, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं.
आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
यावेळी ते म्हणाले, "शिवसेना खरी वाढली ती कोकणातून. आम्ही शिवसेनेसाठी कष्ट केले आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यांनी साधी अंगणवाडीही कोकणात बांधली नाही. उलट कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला मात्र विरोध केला." ही बातमी ई-सकाळने दिली.