यामुळे मुंबईवर मराठीचा ठसा उमटला. मराठीचा हा ठसा कायम उमटला जावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठी भाषेतून सुरू झाला. सुंदर मुंबईस्वच्छ मुंबई या घोषणेअंतर्गत मुंबईतील सर्व ट्राफीक आयलंड सुंदर आणि हिरवीगार करण्याचं काम १९८६ साली विविध कंपन्यांना त्यांचा लोगो वापरण्याच्या अनुमतीसह दिलं ही संकल्पना त्यावेळी मुंबईत नवीनच होती. या कामावर बरीच टीका झाली. परंतू ही संकल्पना राबविण्यासाठी मला बाळासाहेबांचं सहकार्य आणि प्रोत्साहन मिळालं. मी हाती घेतलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या बाबतीत त्यांनी मला वेळोवेळी धीर दिला.
बाळासाहेब ठाकरे हे ख्यातनाम व वाचकप्रिय व्यंगचित्रकार होते. त्यांच्या व्यंगचित्रातून हजारो शब्दांचे सामर्थ्य व्यक्त होत असे. अशी व्यंगचित्र काढण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. आता सुध्दा फटकारे या त्यांच्या व्यंगचित्र पुस्तकात बाळासाहेबांच्या स्वभावातील हा पैलू स्पष्टपणे दिसून येतो. शिवसेनेत असताना मी लढवय्या नेता म्हणून ओळखला जात होतो. अनेक आंदोलनात मलाच अग्रभागी पाठवीले जात असे. विधानसभेत शिवसेनेचा एकमेव आमदार म्हणून मी हिरीरीने आवाज उठवित होतो. शिवसेना वाढविण्यासाठी मी मोठे योगदान दिलं. पुढे मंडल आयोगाच्या प्रश्नावर माझे आणि शिवसेनेचे मतभेद झाल्यामुळे मी १८ आमदारांसह शिवसेना सोडली. शिवसेना ब गटाचा मी नेता झालो. पक्षांतरानंतर १९९५ मध्ये विधान सभेत विरोधी पक्ष नेता बनलो. माझ्यावर शिवसेनेकडून हल्ले झाले. २५ वर्षे शिवसेनेसाठी शिवसेनेत राहून लढलो.
१९९० साली बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात एक प्रकरण न्यायालयात दाखल केलं होतं. बरीच वर्षं हे प्रकरण प्रलंबित होतं. बाळासाहेबांची प्रकृती विचारात घेता त्यांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टात बोलवणे योग्य नव्हे, असं माझं मत झाल्यामुळे हे प्रकरण मी मागे घेतलं. त्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांसह मातोश्री वर स्नेहभोजनासाठी गेलो. अतिशय आनंदी वातावरणात आमची भेट झाली. आमच्यामध्ये पूर्वी भांडणे झाली होती, याची पूसटशी जाणीव देखील यावेळी झालेल्या आमच्या संवादात बाळासाहेबांकडून दिसून आली नाही. आमच्यातील प्रेमाचे संबंध पुन्हा पूर्ववत झाले. वाढदिवसाला आम्ही एकमेकांना शुभेच्छा देत असू. आमच्यामध्ये असलेला पूर्वीचा कडवटपणा नंतर नाहीसा झाला. ज्या ज्या वेळी मी बाळासाहेबांना भेटलो, त्या त्या प्रत्येक वेळी त्यांचे विचार त्यांचा ष्टीकोन वेगळा असल्याचं जाणवलं. तरी सुद्घा आमच्या स्नेह संबंधामध्ये दुरावा आला नाही. एका प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, शिवसेनेत असताना ती वाढविण्यासाठी ज्या ताकदीनं मी लढलो, शिवसेना सोडल्यानंतर तेवढयाच ताकदीनं शिवसेनेच्या विरोधात लढलो. हिंदूत्वाच्या कार्डाबद्दलच्या आठवणी सांगताना भुजबळ म्हणाले की, शिवसेनेत २० वर्षे मराठी भाषा आणि मराठी जनतेसाठी कार्य करीत होतो. तरीसुद्घा शिवसेना विधान सभेत जाऊ शकली नाही. ठाणे तसेच मुंबई महापालिकेत शिवसेना जिंकली होती. मात्र, विधान सभेत जाण्यासाठी हिंदुत्वाचे कार्ड शिवसेनेला वापरावे लागले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथे दुर्गा पूजनानंतर झालेल्या आंदोलनात मी वेषांतर करुन गेलो होतो.
याविषयावर नागपुरच्या विधानसभा अधिवेशनात चर्चाही झाली होती. काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांकाच्या बाजूने बोलत होता. हिंदुत्वासाठी मी कडक शब्दात आणि घणाघाती बोललो होतो. भाषण करताना काहीही बोलण्या ऐवजी विधान सभेत हाताच्या बोटाची मी विशिष्ट खूण केली होती. त्यावर मोठा गहबज झाला होता. मार्शलकरवी मला सभागृहाच्या बाहेर काढण्यात आलं होतं. १५ दिवस मी बाहेर होतो. विधानसभेत मी जे काही केलं,त्याची माहिती देण्यासाठी भीतभीतच बाळासाहेबांना भेटलो. कदाचीत ते रागवतील, अशी मला भिती वाटत होती. मात्र, बाळासाहेबांनी मला या प्रकरणी शाबासकीच दिली. शिवसेनेने घेतलेल्या हिंदुत्वाच्या कार्डावर निवडून आलेला शिवसेनेचा पहिला आमदार म्हणजे डॉ.रमेश प्रभू होय. टी.बाळू आणि लखोबा याबाबत बोलताना भुजबळांनी आपली आठवण सांगितली. ते म्हणाले, मी विरोधी पक्ष नेता होतो. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनाभाजपचं सरकार होतं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक वर्ष कुठल्याही वृत्त पत्रात किंवा प्रसिद्घी माध्यमात सेनाभाजपाच्या विरोधात एक अवाक्षरही छापलं गेलं नाही. याच काळात मी विरोधी पक्ष
नेता होतो. टीका करणं हे माझं काम होतं. याच काळात घाटकोपर येथे एक सभा झाली. तत्पूर्वी मी शिवसेना सोडल्यामुले मला लखोबा हे नाव देऊन माझ्यावर टीका केली जात असे. याच घाटकोपरच्या सभेत मी माझ्या घणाघाती भाषणात बाळासाहेबांचा उल्लेख टी.बाळू असा केला.
नंतरच्या काळात किणी प्रकरण, मनोहर जोशी प्रकरण इत्यादी प्रकरणे बाहेर आली, वर्तमानपत्रात टीका सुरू झाली.शिवसेना सोडल्यानंतर माझ्यावर शिवसैनिकांनी मंत्रालय समोरच्या बंगल्यात मी राहत असताना मोठा हल्ला केला. बंगल्याच्या पुढून आणि पाठीमागून शिवसैनिक मला मारण्यासाठी बंगल्यात घुसले. त्यांनी बंगल्याचं वातानुकुलीत यंत्र फोडलं, दरवाजे फोडले, मी बंगल्याच्या शयन कक्षात होतो. माझ्या रक्षणासाठी एक पोलीस गार्ड आणि एक नवीन पोलीस तैनात होता. माझ्यावर आलेला बाका प्रसंग पाहून माझा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर माझ्या मदतीसाठी धावून आले होते. परंतू मी त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं. माझ्या समवेत असलेल्या पोलिसाला काय सुबुद्घी सुचली कोणास ठाऊक? समोर हल्लेखोर दिसताच त्यानं हातातील बंदूक ताणून धरली आणि स्वतःच फायर फायर म्हणून जमावाच्या दिशेनं धावत गेला. त्याच्या या कृत्यामुळे आता गोळीबार होणार म्हणून माझ्यावर हल्ला करण्यासाठी आलेला जमाव पांगला गेला. अन्यथा त्यावेळी माझी काही खैर नव्हती. ४५ वर्षांपूर्वी शिवसेनेची निर्मिती करुन बाळासाहेबांनी शिवसेनेचा झेंडा मंत्रालयात फडकविण्याचं महाराष्ट्राला स्वप्न दिलं. आणि प्रयत्नपूर्वक त्यांनी ते साकार देखील केलं. एवढचं नव्हे तर लोकसभा आणि राज्यसभेत देखील त्यांनी शिवसेनेचे खासदार पाठविले. काही जणांना केंद्र सरकारमध्ये मंत्री सुद्घा केलं. बाळासाहेबांनी जे जे कार्य केलं, ते जागतिक दर्जाचं होतं. जाहीर सभेत बोलताना ते कधीच घाबरत नसत. तडजोड हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता. त्यांच सडेतोड बोलणं लोकांना भावायचं. बाळासाहेबांच्या शब्दाखातर लोक प्राण देण्यास तयार असंत. वार्ताहराने विचारलेल्या, बाळासाहेब आणि उद्घव ठाकरे यांना आपणहल्ली भेटलात. या भेटीच्या वेळी त्यांनी तुम्हाला तुम्ही शिवसेनेत परत यावं, असं सागितलं का? या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ दिलखुलासपणे हसले आणि ही मुलाखत संपली.
( छगन भुजबळ यांनी प्रसिद्घिमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींचा संपादित भाग)