suvichar

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

वेबदुनिया
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेस साजरी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे असे महापुरुष होऊन गेले की, त्यांच्या महानिर्णाणाला 332 वर्षे झाली तरीही त्यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे. आजही आपण त्यांच्या काळासंदर्भात त्यांच्या स्वराज्य निर्मितीचा विचार करायला लागतो तेव्हा त्यांनी किती प्रतिकूल स्थितीत हे सतीचे वाण आपल्या हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो. शिवाजी महाराज त्या प्रदेशात रहात होते तो प्रदेश आदिलशहाच्या अधिपत्याखाली होता आणि त्या मध्ययुगीन राजवटींमध्ये सुलतानांच्या विरोधात बंडावा करणे म्हणजे प्राणाशी गाठच असायची. डोळे फोडणे, मालमत्तेची राखरांगोळी करून जबर दंड बसवणे, कुटुंबांसह जाळून हत्या करणे, तोफोच्या तोंडी देणे, कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्यांच्या पायांना बांधून फरपटत नेणे अशा अमानुष शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानांच्या पायाशी शरण जाणे परवडेल अशी मानसिकता समाजता होती, पण शिवाजी महाराजांनी अशाही स्थितीत परकियांची राजवट उलथून टाकून स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा पण केला. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असते.

एकदा असे साहस करण्याचा निर्धार केल्यावर कितीही संकटे आली तरीही आपल्या ध्येयापासून विचलित न होण्याचा त्यांचा गुणही असामान्यच होता. राजेच निश्चयापासून ढळले असते तर सारे सहकारीही बिथरले असते. म्हणून खंबीरपणे उभे राहून महाराजांनी केवळ अडचणींना तोंडच दिले असे नाही तर त्या अडचणींतून मोठ्या कुशलतेने मार्गही काढला. महाराजांनी आपल्या सवंगड्यात स्वराज्य स्थापनेचा ध्येयवाद इतका पक्का रुजवला होता की, त्या ध्येयवादाच्या मार्गातून त्यांचे सहकारी कधीही ढळले नाहीत. शिवाजी महाराजांचे काही आप्तच त्यांचा विरोधात होते. अशावेळी त्यांना निष्ठा वाहिलेल्या कोणीही, महाराजांचे आप्तच स्वराज्याच्या विरोधात आहेत मग आपणच स्वराज्यापायी आपल्या संसाराची वाताहत कशाला करून घ्यायची असा विपरीत विचार केला नाही. त्यंनी आपली निष्ठा महाराजांना वाहिली.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हाच केवळ त्यंचा मोठेपणा आहे असे नाही, तर त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि अक्षरश: मूठभर सहकार्‍यांच्या मदतीने ते इतिहासदत्त कार्य केले. असे करण्यासाठी लागणारी धीरोदात्त वृत्ती, संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते म्हणूनच हे शक्य झाले. त्यांच्या अंगी असलेल्या या गुणांचा अभ्यास, विश्लेषण आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे.

मध्ययुगामध्ये अनेक राजे, महाराजे आणि सुलतान होऊन गेले. त्या प्रत्येकाशी तुलना केली तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य विस्ताराने फारसे मोठे नव्हते. परंतु त्यांच्या समकालीन असलेल्या कोणत्याही सुलतानापेक्षा किंवा शहापेक्षा शिवाजी महाराजांचे पोवाडे जास्त गायिले जातात. त्याचे सर्वात मोठे कारण होते शिवाजी महाराजांची प्रजाहितदक्षता. आपल्या राज्यामध्ये प्रजेला कसलाही त्रास होता कामा नये याबाबत महाराज कमालीचे दक्ष होते. त्यामुळे त्यावेळच्या प्रजेला स्वराज्य आपले आहे असे वाटत असे. अन्य राजवटीच्या बाबतीत असे घडलेले नव्हते, हे महाराजांचे वैशिष्ट होते. त्याकळेचे जाहगीदार, वतनदार प्रजेला पिळून स्वत: ऐटित राहत असत आणि सामान्य माणांसावर अनेक प्रकारचे अत्याचार करत असत. परंतु प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारे शिवाजी महाराज हे त्या काळात एक आगळेवेगळे राजे म्हणून जाणले जात. प्रजेला सवलती देणारा राजा ही संकल्पनाच त्या मध्ययुगामध्ये क्रांतीकारक ठरलेली होती. म्हणूनच शिवाजी महाराजांविषयी असे म्हटले जाते की, राजे तर अनेक होऊन गेले, पण त्यातल्या कोणत्याही राजाला प्रजेने देवाचा अवतार मानलेले नव्हते. शिवाजी महाराजांना मात्र जनतेने देवाचा अवतार मानलेले होते. शिवाजी महाराजांचे हे वैशिष्ट्य आजच्या राज्यकर्त्यांनी अवश्य विचारात घेतले पाहिजे. कारण आपले आजचे राज्यकर्ते प्रजाहितदक्षतेचे कर्तव्य सोडून बाकी सगळ्या वाईट गोष्टी करायला लागले आहेत आणि त्यामुळे राजे आरामात जगत आहेत आणि प्रजा मात्र अनेक संकटांशी मुकाबला करत भरडली जात आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या राज्यकर्त्यांनी एवढे चिंतन केले तरी प्रजा त्यांना दुवा देईल.
- विलास कदम
सर्व पहा

नवीन

Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीचे व्रत कधी पाळले जाते आणि त्याचे महत्त्व काय?

Ramadan 2026 Marathi Wishes रमजान मुबारक खास शुभेच्छा मराठीत

शिवजयंतीच्या निमित्ताने पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ नक्की करून पहा; जे महाराजांचे देखील प्रिय आहे

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments