Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकरी आंदोलन: गाझीपूर, सिंघू आणि टिकरी बॉर्डरवर बॅरिकेडिंग कशासाठी?

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (18:34 IST)
संयुक्त किसान मोर्चानं सहा फेब्रुवारीला सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर तीन तासांसाठी 'रस्ता रोको' आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
 
सोमवारी (1 फेब्रुवारी) संध्याकाळी एक पत्रकार परिषद घेऊन शेतकरी नेत्यांनी 6 फेब्रुवारीला 12 ते 3 वाजेपर्यंत राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर रस्ता रोको करणार असल्याचं जाहीर केलं.
 
सोमवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचंही शेतकरी नेत्यांनी सांगितलं.
 
"26 जानेवारीला झालेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर अनेक शेतकरी बेपत्ता झाले आहेत. सीमांवर रस्ते बंद करण्यात आले आहे. आंदोलनाच्या आजूबाजूच्या परिसरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. इथलं पाणी आणि वीजही तोडण्यात आली आहे. शौचालयाची व्यवस्थाही बंद केली जात आहे," असं शेतकरी नेत्यांनी म्हटलं.
 
आंदोलनाच्या समर्थनासाठी येत असलेल्या लोकांना अडवलं जात असल्याचाही आरोप या नेत्यांनी केलं.
 
गाझीपूर, सिंघू आणि टिकरी या दिल्लीला लागून असलेल्या तिन्ही सीमांवर सोमवारी (1 फेब्रुवारी) सकाळी पोलिस प्रशासनाने रस्ता बंद केला होता. त्यामुळे या तिन्ही मार्गांवर ट्रॅफिक जामची परिस्थिती पहायला मिळाली.
 
या सीमांवर पोलिसांनी बॅरिकेडिंगही केलं होतं. तिन्ही सीमांवर बॅरिकेडिंगची काय परिस्थिती आहे आणि त्यासंबंधी शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे? गाझीपूर सीमेवरून बीबीसी हिंदीसाठी समीरात्मज मिश्र यांनी घेतलेला आढावा-
 
गाझीपूर बॉर्डरवर जिथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथे रविवार (31 जानेवारी) संध्याकाळपासूनच सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
 
उत्तर प्रदेशकडून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळे उभे करण्यात आले आहेत. पायी जाण्यासाठीचे अनेक रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
 
गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेलं आंदोलन कव्हर करत असलेले पत्रकार प्रभाकर मिश्र सांगत होते, "मी आज सकाळी दोन तासांपासून रस्ता शोधत होतो.
 
"या भागातील डीसीपींकडेही मी मदत मागितली. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्नही केला, पण मी ट्रॅफिक जाममध्ये अडकलो आणि इतर लोकांप्रमाणेच इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रस्ता सापडतोय का हे शोधायला लागलो," मिश्र सांगतात.
 
दिल्लीहून युपीकडे येणारा केवळ एकच रस्ता खुला करण्यात आला आहे, जो आनंद विहारवरून गाझियाबादकडे येतो. इकडेही केवळ एकच रस्ता खुला असून त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा आहेत.
 
पोलिसांनी अशा प्रकारचा कडेकोट बंदोबस्त का केला आहे, याचं उत्तर दिल्ली पोलिसांचे अधिकारी देत नाहीयेत. आम्हाला 'वरून आदेश आले आहेत' हे उत्तर तिथे असलेले पोलिस अधिकारी देतात. तिथे उपस्थित असलेल्या तरुणांनी सांगितलं की, इथून पुढे कोणी जाऊ शकत नसल्याचं आम्हाला सांगण्यात आलंय. आम्हाला इथं लक्ष ठेवण्यासाठी नेमलं आहे.
 
गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी पुन्हा जमायला लागल्यापासून इथं गर्दी वाढत चालली आहे. आता तंबू वाढवू नयेत म्हणून पोलिसांनी कडेकोट सुरक्षा वाढविली असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
 
या भागातले बरेचसे लोक दिल्लीमध्ये काम करतात आणि वसुंधरा, वैशाली, इंदिरापुरम, कौशांबी या भागांमध्ये राहतात. रस्ते बंद असल्यामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.
 
नोएडा सेक्टर 62 इथून रेल्वेची परीक्षा देऊन येत असलेल्या मनीष यादव यांनी बीबीसीला सांगितलं, "मी तर इथेच राहतो. मला चालत जाण्यासाठी रस्ते माहीत आहेत. मात्र अनेक लोक खूप वेळ झाला भटकत आहेत."

संबंधित माहिती

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

पुढील लेख
Show comments