Publish Date: Mon, 23 Nov 2020 (11:27 IST)
Updated Date: Mon, 23 Nov 2020 (11:49 IST)
दिवाळी ही खर्या अर्थाने संपते ती तुळशीचे लग्न झाल्यावर. तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात.
तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.
तुळशी विवाह विधी
तुळशीशी विवाह सोहळा कार्तिक एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात. तुळशी विवाहाचे हे व्रत केल्याने कर्त्यांला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते.
घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला नवीन वस्त्र पांघरले जातात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करण्याची पद्धत असते.