Publish Date: Fri, 19 Apr 2019 (10:33 IST)
Updated Date: Fri, 19 Apr 2019 (10:35 IST)
नेहरू-गांधी कुटुंबाने देशाची सेवा केली आहे. वेळप्रसंगी तुरुंगवास भोगला. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या झाली. हा देशासाठी त्याग नाही का?, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे सभा झाली. त्यावेळी पवार बोलत होते.ते म्हणाले, देशाचे राज्य चालवायचे असेल तर प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे आहेत. ते समजावून घेतले पाहिजेत. मात्र प्रश्न समजावून घेणारी टीम पंतप्रधानांकडे नाही.रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या सभेत सर्व रंगांचे कपडे घालणार्यांना प्रवेश असतो. मोदी साहेब हे फक्त शरद पवार यांच्यावरच बोलतात. पवार हेच सर्व पक्षांना एकत्रित करू शकतात. म्हणून मोदी यांना शरद पवार यांची भीती वाटत असावी. कर्जमाफी दिली म्हणजे उपकार केल्यासारखे ते बोलत आहेत. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा कोणालाही लाभ झाला नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना सरसकट कर्जमाफी दिली गेली.निवडणुकीच्या आधी काही दिवस सरकारने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. भाजपाचा कार्यकर्ता असेल तिथेच पालकमंत्र्यांनी छावण्या दिल्या, असा आरोप त्यांनी केला.