Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे : महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (09:42 IST)
महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.
 
महादेव गोविंद रानडे यांचा १८ जानेवारी १८४२ जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. १८५६ नंतर ते आणि त्यांचे मित्र विनायक जनार्दन कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले. मॅट्रिक, एमए नंतर ते १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली.
 
रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. पण त्यांचे १८७३ साली निधन झाले. माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला. लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले. पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले.
 
इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. न्या.रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. 
 
रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्रयाच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.
 
भारतीय समाजात संकुचित वृत्ती, जातिभेदांचे पालन असे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. "ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.
 
दिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या ‘राष्ट्रीय कॉंग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेतही (इ.स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता.
 
अनेक घटनांच्या संदर्भांत त्यांना टीका सहन करावी लागली. त्यांच्या कामांबद्दल लोकांमध्ये रोष होता कारण तेव्हा समाजसुधारकांना फार विरोध होई. माधवरावांच्या या समाजसुधारकी कामालाही सनातनी वर्गाकडून सतत विरोध झाला. माधवरावांनी तो विरोध सहनशीलतेने आणि समजुतीने हाताळला.
 
रानडे यांनी १६ जानेवारी १९०१च्या रात्री जस्टीन मेकार्थी याचे ‘हिस्ट्री ऑफ अवर ओन टाईम्स’ हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तक वाचायला बसले नाहीत तोवर त्यांना त्रास सुरु झाला व त्यांची जीवनयात्रा संपली.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments