Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तरकाशी : बचावकार्याचा आज 16वा दिवस, लष्काराला पाचारण, वरून खोदकाम सुरू

labours stuck in tunnel
, सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (12:08 IST)
उत्तरकाशीच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या हॉरिझॉन्टल म्हणजेट आडव्या ड्रिलिंगमध्ये सलग तीन दिवस समस्या निर्माण झाल्यानंतर आता बचावकार्यासाठी वर्टिकल ड्रिलिंग म्हणजेच वरून खोदकाम करण्यात येत आहे. बोगद्यात 15 दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत.
 
रविवारपर्यंत 19.5 मीटरपर्यंत खोदकाम पूर्ण झाले आहे. बचाव पथकाला 86 मीटर वर्टिकल ड्रिलिंग करायचं आहे. जर कोणताही अडथळा निर्माण झाला नाही तर ते करण्यास 100 तास लागतील.
 
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हुसैन म्हणाले, "आमच्याकडे एकूण सहा योजना आहेत. यापैकी काहींवर काम सुरू आहे, काहींवर येत्या काही दिवसांत काम सुरू होईल."
 
हॉरिझोंटल ड्रिलिंगमध्ये ऑगर मशीन 47 मीटर खोलवर अडकलं होतं. पुढील खोदकाम करण्यासाठी एनडीआरएफची टीम आत जाईल. 47 मीटरपर्यंत जो मार्ग तयार केला आहे, त्यापुढील ड्रिलिंग एनडीआरएफच्या मदतीनं मॅन्युअली केलं जाईल.
 
आता लष्करानेही या ऑपरेशनमध्ये काम सुरू केलं आहे, असं सय्यद अता हुसैन यांनी सांगितलं. लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचा भाग असलेल्या मद्रास सॅपर्सची एक तुकडी आता ऑपरेशनमध्ये मदत करत आहे.
 
अतिरिक्त सचिव (तांत्रिक, रस्ते आणि वाहतूक) महमूद अहमद यांनी सांगितलं की, "आम्हाला हे काम पूर्ण करण्यासाठी विशिष्ट अवधीचं टार्गेट देऊन चालणार नाही, पण तरीही आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू आहे, त्यात अडथळे आले नाहीत, तर येत्या 100 तासांत ते काम पूर्ण करणं शक्य आहे."
 
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सोमवारी (27 नोव्हेंबर) म्हणाले,
 
"या कार्यात प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. ऑगर मशीन पूर्णपणे बाहेर काढण्यात आली आहे. पाईपचा काही भाग वाकला आहे त्याचं नुकसान झालं आहे तो भागही कापून काढला जाईल. त्यानंतर ड्रिलिंग आणि पुशिंगचं काम सुरू होईल.
 
आम्हाला आशा आहे की काम लवकरात लवकर पूर्ण होईल. पंतप्रधान मोदी सर्व महत्त्वाच्या गोष्टीची माहिती घेत आहेत. तज्ज्ञ, एनडीआरएफ, एसटीआरएफ, भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कर प्रत्येकजण सहकार्य आणि योगदान देत आहे."
गुरुवारी मोहीम पूर्ण झाली असती पण...
महमूद अहमद यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, गुरुवारीच (23 नोव्हेंबर) कामगारांना बाहेर काढले जाईल, अशी आशा होती परंतु अडचणींमुळे तसे होऊ शकले नाही.
 
बचाव मोहिमेदरम्यान टीमला ढिगाऱ्यात एक धातूचा पाइप सापडला त्यामुळे पुढे जाणे शक्य नव्हते.
 
त्यांनी सांगितले की, "गुरुवारी 1.8 मीटरपर्यंत आत गेल्यावर बोगद्याच्या छतावरील पाईप अडथळा म्हणून आढळला. यामुळे आम्ही ऑगर मशीन पुन्हा आणून काम करावे लागले.
 
सिलक्यारा बोगद्याच्या बचाव कार्यात गुंतलेले उत्तराखंड सरकारचे सचिव नीरज खैरवाल यांनी शुक्रवारी सांगितले की, बचाव कार्य वेगाने सुरू आहे. पण पाईप खराब झाल्यामुळे कामाची गती मंदावली आहे.
 
गुरुवारी बोगद्याच्या आत 1.8 मीटरचा पाइप टाकण्यात आला होता, पण जागेअभावी पाइप पुढे जाऊ शकला नाही आणि पाईपचा 1.2 मीटरचा भाग कापावा लागला. औगर मशीन व्यवस्थित काम करत आहे.
 
बचावकार्य करणारी टीम किती दूर पोहोचली?
बोगद्यात किती अंतरापर्यंत बचाव कर्मचारी पोहोचू शकले आहेत, याची माहिती देताना सय्यद हसनैन म्हणाले, “बोगद्यात आम्ही 48 मीटर पुढे पोहोचलो होतो. पण पाईप वाकल्यामुळे त्यातील 1.2 मीटर भाग कापावा लागला. सध्या आम्ही बोगद्यात 46.8 मीटरपर्यंत पोहोचलो आहोत."
 
शुक्रवारी सकाळपासूनच डॉक्टरांचे पथक आणि डझनभर लाइफ सपोर्ट सिस्टिमसह रुग्णवाहिका बोगद्याच्या बाहेर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
 
मंगळवारी बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये सर्व कामगार सुरक्षित दिसत होते.
 
अन्नासोबतच त्यांच्यामध्ये लाइफ सपोर्ट पाईपद्वारे कॅमेरा पाठवण्यात आला आहे, जेणेकरून त्यांच्याबद्दलची माहिती मिळू शकेल.
 
बचाव कार्य अंतिम टप्प्यात
याआधी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितले की, बचाव कार्य अंतिम टप्प्यात आहे.
 
हे ऑपरेशन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
 
धामी म्हणाले, "पीएम मोदी सतत कामगारांची संपूर्ण माहिती घेत आहेत आणि उपायांवर चर्चा करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व एजन्सी बचाव कार्यासाठी एकत्र काम करत आहेत."
 
पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर कुळबे यांनीही काही अडथळे न आल्यास बचाव पथक शुक्रवारी संध्याकाळपर्यंत कामगारांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
 
बोगद्यातील कामगारांचे नातेवाईक काय म्हणाले?
उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले आपले पती विरेंद्र लवकर बाहेर यावेत, यासाठी त्यांची पत्नी रजनी चातकासारखी वाट पाहतेय.
 
उत्तरकाशीच्या सिलक्यारा गावात बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या यादीत विरेंद्र किस्कूही आहेत.
 
विरेंद्र मुळचे बिहारच्या बांका जिल्ह्यातील आहेत.
 
बोगद्याची घटना घडल्याच्या तीन दिवसांनंतर विरेंद्र यांचे मोठे भाऊ देवेंद्र किस्कू बिहारहून उत्तरकाशीला पोहोचले.
 
सध्या ते बोगद्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका खोलीत राहतायत.
 
विरेंद्र यांची पत्नी रजनीही तिथेच राहतात.
 
दोघेही विरेंद्र यांच्याशी बोलण्यासाठी बोगद्याजवळ जात असतात.
"विरेंद्रची आम्हाला खूप काळजी लागली आहे. त्याला पाहण्यासाठी आम्ही आमच्या घरापासून इतके लांब आलो आहोत. विरेंद्रलाही आमची काळजी वाटत आहे,” असं देवेंद्र सांगतात.
 
बोगद्याजवळ जाऊन पत्नी रजनी आणि भाऊ देवेंद्र दोघे मिळून विरेंद्र यांना रोज धीर देत आहेत.
 
"विरेंद्र आम्हाला विचारतो, दादा आम्हाला बाहेर काढण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? आम्ही म्हणतो इथे दिवसरात्र प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला लवकरच बाहेर काढलं जाईल. तुम्ही काळजी करू नका”
 
देवेंद्र पुढे म्हणतात, "मला दिसतंय की प्रशासनातील लोक जमेल तितक्या वेगाने काम करत आहेत. सुरुवातीला जेव्हा मशीन्समध्ये बिघाड झाला तेव्हा आम्हाला काळजी वाटली होती. पण आता असं वाटतंय की सगळं ठीक होत आहे."
 
विरेंद्र यांची पत्नी रजनीही उत्तरकाशीत आहेत. त्याही आपल्या पतीशी बोलतात.
 
विरेंद्र यांनी त्यांनास सांगितलं की ते रात्री रोटी खातात आणि सकाळी ताजी खिचडी खातात.
 
पण विरेंद्र एकदा बाहेर आले की त्यांनी हे काम करू नये असं पत्नी रजनी यांना वाटतं.
 
“माझे पती सुखरूप बाहेर पडल्यावर त्यांनी हे काम करू नये. दुसरं काहीतरी काम करावं असं आम्हाला वाटतंय."
 
भाऊ देवेंद्र यांचंही तेच मत आहे. "तो (देवेंद्र) उत्खनन ऑपरेटर म्हणून काम करतो. तो हे काम इतरत्र कुठेतरी उघड्यावर करू शकतो. त्याने बोगद्यात काम करू नये, अशी कुटुंबाची इच्छा आहे. पण शेवटी तो बाहेर कधी येणार हे हाच मोठा प्रश्न आहे"
 
गुरुवारी रात्री खोदकाम थांबलं, काय आली अडचण?
उत्तरकाशीच्या सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्याचं काम पुन्हा एकदा ऑगर ड्रिलिंग मशीनमध्ये बिघाड झाल्यानं गुरुवारी (23 नोव्हेंबर) रात्री थांबलं. आज शुक्रवारी (24 नोव्हेंबर) बचावकार्याचा 13 वा दिवस आहे.
 
मजुरांना बाहेर काढण्याच्या कामात 14 तासांच्या व्यत्ययानंतर गुरुवारी ( 23 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता पुन्हा ड्रिलिंग सुरू करण्यात आलं. मात्र, गुरुवारी ( 23 नोव्हेंबर) रात्री पुन्हा मशिनमध्ये बिघाड झाल्यानं ड्रिलिंगचं काम बंद पडलं. त्यावेळी बोगद्यात अडकलेले मजूर केवळ 10 ते 13 मीटर अंतरावर होतं.
 
ज्या प्लॅटफॉर्मवर ड्रिलिंगसाठी मशिन बसवण्यात आलं होतं, त्या प्लॅटफॉर्ममध्ये काही भेगा पडल्या होत्या. त्यामुळे प्लॅटफॉर्म हलू लागला. गुरुवारी ऑगर ड्रिलिंग मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ड्रिलिंगचं काम थांबवण्यात आलं होतं. आतापर्यंत बचावकर्त्यांनी सिल्क्यरा बोगद्यात 46.8 मीटरपर्यंत ड्रिल केलं आहे.
 
या बिघाडानंतर ड्रिलिंगचं काम बंद करण्यात आलं. आता तांत्रिक टीम 25 टन वजनाचा हा प्लॅटफॉर्म स्थिर करण्यात व्यस्त आहे. हा दोष सुधारल्यानंतरच पुन्हा ड्रिलिंग सुरू करता येईल.
उत्तरकाशीत घटनास्थळी उपस्थित असलेले पीएमओचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे शुक्रवारी (23 नोव्हेंबर) सकाळी म्हणाले, "आता परिस्थिती खूप चांगली आहे. काल रात्री आम्हाला दोन गोष्टींवर काम करायचं होतं. पहिलं, आम्हाला मशीनच्या प्लॅटफॉर्मची दुरुस्ती करायची होती. पार्सन्स कंपनीनं ग्राउंड पेनिट्रेशन रडारचं काम केलं. ज्याद्वारे आम्हाला कळलं की पुढील 5 मीटरपर्यंत कोणताही धातूचा अडथळा नाही. याचा अर्थ असा की आमचे ड्रिलिंग सुरळीत व्हायला हवं. आम्ही ढिगारा बाहेर काढत असताना आम्हाला दोन भंगार पाईप्स मिळाले."
 
मजुरांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकली
यापूर्वी मजुरांना बाहेर काढण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्यात आली होती. पण या संपूर्ण ऑपरेशनमध्ये डोंगर आणि त्याचे मोठे खडक एकामागून एक आव्हानं देत आहेत.
 
57 मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याच्या कामात लोखंडी गर्डर अडथळा बनला, तेव्हा आम्हाला त्या आव्हानांची झलक दिसली.
 
सर्व पर्यायांपैकी सरकारनं अखेर हॉरिझॉन्टल रेस्क्यू पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये 800 मिलीमीटर (32 इंच) रुंदीचे जाड पाईप टाकण्याचं काम करण्यात आलं.
 
प्रथम ऑगर मशीन बसविण्यात आलं, ज्याद्वारे पाईपसाठी जागा तयार करण्यासाठी ड्रिलिंग केलं गेलं. त्यानंतर या पाईप्सची एक लाईन करण्यात आली. प्रत्यक्षात, पाईपलाईनचा जवळजवळ अर्धा भाग 900 मिलीमीटर आहे. आणि नंतर पुढील पाईप 800 मिलीमीटर रुंदीचे बसवण्यात आले.
 
वेल्डिंगला दोन ते तीन तास लागले. कारण ही टॉर्क वेल्डिंग पद्धत आहे, ज्यामुळे लोखंड गरम होतं आणि ते थंड होण्यासाठी आणि व्यवस्थित सेट होण्यासाठी सुमारे 2 ते 3 तास लागतात.
 
या वेळेपूर्वी दुसरा पाईप जोडण्याचा प्रयत्न केल्यास, वेल्डिंग आणि पाईप खराब होऊ शकतात.
 
गर्डर कापून मार्ग तयार केला होता
बुधवारी ( 22 नोव्हेंबर) सायंकाळी पाईपलाईन टाकण्याचं काम ढिगाऱ्यामध्ये गर्डर आल्यामुळे खोळंबल्यानं ऑगर मशीनचं काम बंद पडलं होतं.
 
घटनास्थळी उपस्थित असलेले इंटरनॅशनल टनेलिंग अंडरग्राउंड स्पेसचे अध्यक्ष अरनॉल्ड डिक्स यांनी गुरुवारी (23 नोव्हेंबर) संध्याकाळी सांगितलं की, आमची काल अशी अपेक्षा होती की या वेळेत मजूर बाहेर पडतील. पण आज सकाळी आणि आज दुपारी सुद्धा आम्ही अशीच अपेक्षा करत होतो. पण असं दिसतं की डोंगराची काही वेगळीच इच्छा होती. आम्हाला ऑगर मशीन बंद करावी लागली आणि मशीनवर काही दुरुस्ती केली जात होती."
 
ते म्हणाले, "कदाचित आम्ही अशा टप्प्यात प्रवेश करत आहोत जिथ आम्हाला इतर पर्यायांचा विचार करावा लागेल."
 
ऑगर मशिनच्या साह्याने ड्रिलिंगचे काम केलं जातं आणि त्याचा वापर करून पाइपलाइन टाकण्यासाठी जागा तयार केली जात होती.
 
13 किमी लांबीचा झोझिला बोगदा हा भारतातील सर्वात लांब बोगदा आहे. त्याचे प्रकल्प प्रमुख हरपल सिंह देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की, ड्रिलिंगचं काम सुरू असताना त्यामध्ये गर्डर आला होता. तो गर्डर कापण्यासाठी गॅस कटर आणण्यात आलं होतं. आणि त्याला कापून काढल्यानंतरच मशीननं पुन्हा ड्रिलिंग सुरू केलं.
 
12 मीटरचं अंतर पार करण्यासाठी संघर्ष
हरपाल सिंह म्हणाले, "पाईपला पुश करायला, वेल्ड करायला आणि गर्डर कापायला थोडा वेळ लागतो."
 
बुधवारी सायंकाळपर्यंत 44 मीटर पाईपलाईन टाकण्यात आली असून अजून 12 मीटर टाकणं बाकी असल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण 57 मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्याचं उद्दिष्ट होतं.
 
प्रत्येकी सहा मीटरचे तीन पाइप जोडण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.
 
जरी पाईप मध्यभागी थोडेसे दाबले गेले आणि ते 24 इंच रुंद असले तरीही मजुरांना त्यातून बाहेर काढता येईल. त्यामुळे मोठ्या रुंदीचे पाईप वापरले जात आहेत.
 
दुसरीकडे मजुरांना सुरक्षितपणे रुग्णालयात नेण्यासाठी एनडीआरएफचे जवान घटनास्थळी तैनात आहेत. बोगद्याजवळ डझनभर रुग्णवाहिकाही उभ्या असून स्ट्रेचरही आणण्यात आले आहेत.
 
बचाव कार्यात कोण सहभागी आहेत
एसजेव्हीएनएल ही ड्रिलिंग आणि पाइपलाइनचे काम पाहत आहे. हा सरकारी प्रकल्प आहे.
 
बोगद्याचे कामही रेल्वे पाहते, त्यामुळे तेथील तज्ज्ञ आणि अधिकारीही उपस्थित असतात.
 
एनएचआयडीसीएल या बोगद्याचे बांधकाम पाहत असून त्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. आयटीबीपीचे जवानही येथे उपस्थित आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ (राज्य युनिट) च्या टीम देखील इथं बचाव कार्यात गुंतलेल्या आहेत.
 
तज्ज्ञांना पाचारण
बोगद्यातील ढिगाऱ्यात ड्रिल करत असलेले बचाव कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या जवळ आहेत, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
 
उत्तरकाशी रेस्क्यू ऑपरेशन टीमचे सदस्य गिरीश सिंह रावत म्हणाले की, "रेस्क्यू ऑपरेशन जवळपास शेवटच्या टप्प्यात आहे, मला आशा आहे की 1-2 तासात निकाल येईल.कामगारांना बाहेर काढण्यासाठी पाइपलाइन टाकली जात आहे.ढिगाऱ्यात अडकलेले स्टीलचे तुकडे कापून काढण्यात आले आहेत. पाईपलाईन ड्रिलिंगमध्ये उद्भवलेली समस्या सोडवली गेली आहे.पाइपलाईन टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. बोगद्यात मध्ये वीज पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय.
सिलक्यारा बोगदा पीआरओनं सांगितलं की ढिगाऱ्यात धातूचे मोठे गज होते जे कापणं अवघड कार्य होतं. छोटे धातूचे तुकडे ते कापू शकतात. पण धातूचे मोठे गज कापण्यासाठी त्यांना जड यंत्रांची आवश्यकता आहे.ते आत ढिगाऱ्यातून काढणं आवश्यक आहे. काम लवकर सुरू व्हायला हवं.
 
वेल्डिंगतज्ज्ञांना दिल्लीहून सिलक्यारा बोगद्याच्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे जेथे अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.
 
बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय
उत्तरकाशी इथं घडलेल्या घटनेनंतर देशात सुरू असलेल्या 2 डझनांपेक्षा जास्त बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी देशातल्या 29 बोगद्यांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
हे ऑडिट एनएचएआयसह दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनचे अधिकारी करतील. या दोन्ही संस्थांनी एकत्रित काम करुन एका आठवड्याच्या आत अहवाल द्यावेत असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
 
यातले 12 बोगदे हिमाचल प्रदेशात, 6 जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि बाकीचे उत्तराखंड आणि इतर राज्यांत आहेत.
 
बुधवारी (22 नोव्हेंबर) संध्याकाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की त्यांना खात्री आहे की गुरुवारी दुपारपर्यंत कामगारांची सुटका केली जाईल.
 
12 नोव्हेंबर रोजी कामगार बोगदा बांधत असताना भूस्खलनामुळे त्याचा काही भाग कोसळला होता.
 
अधिकाऱ्यांनी काही तासांतच या बोगद्यात अडकलेल्या कर्माचाऱ्यांशी संपर्क स्थापित केला होता.
 
बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन,अन्नपदार्थ आणि पाणी पोहचवण्यात आलं. याप्रकरणी अधिकारी नियमित अपडेट देत असून बचाव कार्य अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पण मजुरांचे कुटुंब आणि मित्र चिंताग्रस्त आणि संतप्त झाले आहेत. मजुरांना काढण्यासाठी इतका वेळ का लागतो आहे असा प्रश्न त्यांना पडलाय.
सोमवारी(20 नोव्हेंबर) एंडोस्कोपिक कॅमेरा नवीन पाईपमध्ये टाकून मजुरांचा पहिला व्हीडिओ मिळाला होता. अधिकाऱ्यांनी त्यांना कॅमेऱ्यासमोर स्वतःची ओळख पटवण्यास सांगितलं आणि लवकरच त्यांची सुटका केली जाईल असं आश्वासन दिलं. मदत करणारे कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहेत.
 
नवीन पाईप रुंद आहे आणि अधिकारी म्हणतात की ते आता अधिक ऑक्सिजन, अन्न आणि औषधे, मोबाईल फोन आणि चार्जर यांसारख्या आवश्यक गोष्टींचा पुरवठा करता आला.
 
मंगळवारी ( 21 नोव्हेंबर) तब्बल 10 दिवसांनी कामगारांना पहिलं गरम जेवण पोहचवण्यात आलं. डाळ तांदुळाची खिचडी पॅक करून त्यांना गरम जेवण बोगद्याच्या आत पाठण्यात आलं.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात 13 लाख हेक्टरमध्ये नैसर्गिक शेती राबविण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रथमच आर्ट ऑफ लिव्हिंगसोबत सामंजस्य करार