Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात 5 टप्प्यांत अनलॉक होणार की नाही? गोंधळ का झालाय?

Webdunia
शुक्रवार, 4 जून 2021 (11:30 IST)
राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथील होणार का, यावरून मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचं वातावरण पहायला मिळालं.
 
हा गोंधळ निर्माण व्हायला कारणीभूत ठरली मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली घोषणा.
 
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात येणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
 
कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशापद्धतीनं निर्बंध हटवले जातील, यासंबंधीची रुपरेखाही त्यांनी मांडली.
 
मात्र थोड्याच वेळात ही लॉकडाऊन हटविण्याबद्दलची अधिकृत घोषणा नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेविषयीचे निकष सर्व प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यांकडून व्यवस्थित तपासून घेण्यात येत आहेत. संपूर्ण आढावा घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल. याविषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळविली जाईल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं.
त्यामुळेच लॉकडाऊन हटविला जाणार की नाही याबाबत मुख्यमंत्री कार्यालय आणि पुनर्वसन मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
 
या गोंधळानंतर विजय वडेट्टीवार यांनी आपत्ती आणि व्यवस्थापनाच्या बैठकीत अनलॉकच्या निर्णयाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण दिलं. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही सारवासारव केली.
 
यासंदर्भातली अधिकृत घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
 
विमानतळावर माध्यमांशी बोलल्यानंतरही वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदही घेतली. त्यावेळीही त्यांनी तत्वतः शब्द सांगायचा राहून गेला असं म्हणत राज्यात टप्प्याटप्प्यानेच निर्बंध शिथील केले जातील असं म्हटलं.
 
विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं होतं?
आपत्ती आणि व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी आज (3 जून) माध्यमांशी संवाद साधला.
 
पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्ह्यांची पाच टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आला आहे. उद्यापासून (4 जून) अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.
 
पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत थिएटर्स, कार्यालय, सलून, जिम, शूटिंग सुरू होणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
 
लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांची परवानगी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरजिल्हा प्रवेशाला मुभा असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
 
ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या अठरा जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यांत समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबारचा समावेश आहे. या ठिकाणी कलम 144 लागू राहील. विवाहाला उपस्थित पाहुण्यांच्या संख्येवरही बंधनं आहेत. या ठिकाणी जिम, सलून, पार्लरही पूर्ण क्षमतेनं सुरू होणार नाहीत.
 
तिसऱ्या टप्प्यांत अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यामधील लॉकडाऊन हटवला जाईल.
 
चौथ्या टप्प्यांतील जिल्ह्यांमध्ये पुणे आणि रायगड असून पाचव्या टप्प्यांतील जिल्ह्यांमध्ये 'रेड झोन'मधील उर्वरित जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यात 30 मे रोजी लॉकडाऊनबाबतचे नवीन नियम जाहीर करण्यात आले होते.
 
'ब्रेक दि चेन'चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून निर्बंध शिथील करण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ही सवलत देण्यात आली आहे.
 
30 मे रोजी 'ब्रेक द चेन' अंतर्गत जाहीर केलेले नियम काय होते?
पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील
2011 च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल.
 
या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.
मुंबईतील नवे नियम
मुंबईत आता अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
आता इतर दुकानांनासुद्धा सवलती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत पहिल्या आठवड्यात रस्त्यातच्या उजव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सरू राहतील. तर
डाव्या बाजूची दुकानं मंगळवार, गुरूवार आणि शनिवार सुरू राहतील.
त्यानंतरच्या पुढच्या आठवड्यात डाव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर उजव्या बाजूची दुकानं मंगळवार, गुरूवार आणि शनिवार सुरू राहतील.
या दरम्यान ई-कॅामर्स कंपन्यांना आता अत्यावश्यक वस्तूंसोबत इतर आवश्यक वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी
 
ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील.
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील.
संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील.
येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.
पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी
 
वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील. अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही.
केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे 2021 'ब्रेक दि चेन'चे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments