Publish Date: Fri, 02 Dec 2022 (14:36 IST)
Updated Date: Fri, 02 Dec 2022 (14:39 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच जातीपातीचं राजकारण होत आहे, असा आरोप पुन्हा एकदा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंनी केल्यानंतर त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या आरोपांवरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवरून टोला लगावला आहे. तसेच, त्यांनी शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखतीचाही उल्लेख अजित पवारांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शरद पवारांना महाराष्ट्र ५५ वर्ष ओळखतोय. ५५ वर्ष शरद पवार राजकारण करत आहेत. त्यांनी नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार डोळ्यांसमोर ठेवला. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद बाब आहे. त्यात नखभरही तथ्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.
Edited by: Ratnadeep Ranshoor