कोरोना व्हायरसशी लढताना माणुसकी किती घट्ट झालीय, याची प्रचिती उत्तर प्रदेशात दिसून आली. विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नातेवाईकांनी अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली. मात्र, अशा कठीण काळात मुस्लीम बांधवांनी पुढे येत अंत्यसंस्कार केला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
बुलंदशहरमधील रविशंकर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याच्या भीतीनं घरी येणं टाळलं. त्यामुळं अंत्यसंस्काराची मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, शेजारील मुस्लीम बांधव पुढे आले आणि त्यांनी प्रेताला खांदा देण्यापासून पुढील सर्व अंत्यसंस्कार केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विटरवरून या घटनेची दखल घेत, हीच खरी 'आयडिया ऑफ इंडिया' असल्याचं म्हटलं.