Marathi Biodata Maker

श्रीरामविजय - अध्याय २४ वा

Webdunia
अध्याय चोवीसावा - श्लोक १ ते ५०
श्रीगणेशाय नमः ॥


कळेल समुद्राचा अंत ॥ सांपडेल अंबराचें गणित ॥ त्याहून रामकथा अद्भुत ॥ नलगे अंत कवणातें ॥१॥
अद्भुत धांवे प्रभंजन ॥ त्याची मोट बांधवेल आकर्षून ॥ परी या रघुपतीचे चरण ॥ वर्णितां अंत न कळेची ॥२॥
सहस्रवदनेंकरून ॥ वर्णी काद्रवेयकुळभूषण ॥ नेति नेति म्हणोन ॥ वेदही तेथे तटस्थ ॥३॥
रघुवीरगुणांची सरोवरपाळ ॥ तेथें व्यास वाल्मीक हे मराळ ॥ ज्यांच्या मतीमाजी सकळ ॥ ब्रह्मांड हे ठेंगणें ॥४॥
तिहीं गुण वर्णितां अपार ॥ अंत न कळेचि साचार ॥ तेथें मानवशलभ पामर ॥ गुणांवर केविं क्रमी ॥५॥
तरी सांडोनि अभिमान ॥ वर्णावे रघुपतीचे गुण ॥ गंगाप्रदेश म्हणोन ॥ तृषाक्रांता केवि सोसवे ॥६॥
तैसे सीतावल्लभाचे गुण ॥ वर्णावे यथामतिकरोन ॥ असो पूर्वाध्यायीं अनुसंधान ॥ आला रघुवीर सुवेळे ॥७॥
आतां वाग्देवी परम डोळस ॥ उघडी युद्धकांडमांदुस ॥ त्यांतील साहित्यरत्नें विशेष ॥ ग्राहक पंडित तयांचे ॥८॥
रावणाचीं दाही छत्रें ॥ छेदोनि पाडिलीं सौमित्रें ॥ परम म्लान दाही वक्रें ॥ मयजापतीची जाहली ॥९॥
सकळ प्रधानांसहित ॥ विचारा बैसला लंकानाथ ॥ माझे तरी दोन हेत ॥ कैसे पुरती नेणें मी ॥१०॥
रामलक्ष्मणां संहारूनी ॥ वश्य व्हावी जनकनंदिनी ॥ यावेगळी माझे मनीं ॥ चिंता दुसरी नसेचि ॥११॥
तंव वज्रदंष्ट्र म्हणे लंकानाथा ॥ सीतेची भीड कासया धरितां ॥ बळेंचि आणोनि तत्वतां ॥ कामना आपुली पुरविजे ॥१२॥
मग बोले दशकंधर ॥ मज विरिंचीचा शाप थोर ॥ परस्त्रीवरी करितां बलात्कार ॥ शतचूर्ण तरु होय पैं ॥१३॥
मृगपतीचे फुटले नयन ॥ कीं व्याघ्राचे हस्त टाकिले तोडोन ॥ कीं भुजंगाचे दांत पाडून ॥ केली दीन गारोडिये ॥१४॥
वनी सर्वांत श्रेष्ठ वारण ॥ परी सिंह देखतां तात्काळ मरण ॥ तैसा मी शापबंधनें पूर्ण ॥ बळक्षीण जाहलों ॥१५॥
तरी ते जनकजा मनींहूनी ॥ आपणचि वश्य होईल शयनीं ॥ ऐसी करणी करा कोणी ॥ राघवीं मन विटे तिचें ॥१६॥
मग विद्युज्जिह्व प्रधान ॥ जो कापट्यविद्येमाजी प्रवीण ॥ तो म्हणे मी निर्मीन ॥ रघुत्तमाचें शिरकमळ ॥१७॥
आणि राघवहस्तींचे कोदंड ॥ मायामय निर्मीन प्रचंड ॥ तेणें सीतेचें हृदयखंड ॥ असत्य न वाटे सहसाही ॥१८॥
ऐसें ऐकतांचि लंकापति ॥ परम संतोषला पावला चित्तीं ॥ जैसा मद्यपी पाहतां पंथीं ॥ तंव शिंदीवन देखिलें ॥१९॥
आधीच जारकर्मीं रत ॥ त्यांत स्त्रीराज्य जाहलें प्राप्त ॥ कीं श्र्वानें वमन अकस्मात ॥ दृष्टीं देखिलें तेधवां ॥२०॥
कीं निंबोळ्या देखतां बहुवस ॥ परम संतोषे वायस ॥ तैसा हर्षला लंकेश ॥ वचन ऐकतां तयाचें ॥२१॥
विद्युज्जिव्हासी म्हणे लंकापति ॥ आम्हांमध्ये तूं केवळ बृहस्पती ॥ तरी शीघ्र शिरधनुष्यांप्रति ॥ घेवोनि येईं अशोकवना ॥२२॥
कापट्यवेषी विद्युज्जिव्हा ॥ वस्त्राभरणी गौरविलें तेव्हां ॥ कृत्रिम निर्मिले तेधवां ॥ तर्क करितां नेणवेची ॥२३॥
इकडे आधी लंकानाथ ॥ प्रवेशला अशोकवनांत ॥ तों अधोवदनें तटस्थ ॥ जगन्माता बैसली ॥२४॥
सीतेजवळी उभा रावण ॥ जैसा कमळिणीसमीप वारण ॥ कीं हरिणीजवळी येऊन ॥ व्याघ्र उभा ठाकला ॥२५॥
याउपरी राक्षसपाळ ॥ सीतेजवळी बोले अमंगळ ॥ म्हणे तुवां धैर्य धरिलेंसे सबळ ॥ परी ते निष्फळ जाहलें ॥२६॥
मजलागीं तूं आतां वरीं ॥ तुझें सेवेसी मंदोदरी ॥ तुझे आज्ञेत लंकानगरी ॥ वर्तवीन जानकीये ॥२७॥
तुझीया पतीस जाहले मरण ॥ आधी ते ऐके वर्तमान ॥ सागरीं सेतू बांधोन ॥ सुवेळेसी सर्व आले ॥२८॥
तंव आमचा प्रधान प्रहस्त ॥ निमेषामाजी गेला सेनासमवेत ॥ राम सौमित्र होते निद्रिस्थ ॥ तंव घाला तिहीं घातला ॥२९॥
तुझीया पतीचे शिरकमळ ॥ प्रहस्तें छेदिलें तात्काळ ॥ सांवळे कबंध विशाळ ॥ सुवेळेसी पडियेलें ॥३०॥
वधावा जो लक्ष्मण ॥ तंव तो अयोध्येसी गेला पळून ॥ आमचा बंधु बिभीषण ॥ तोही तेथेंचि पडियेला ॥३१॥
सुग्रीव आणि अंगद ॥ त्यांचाही केला शिरच्छेद ॥ जांबुवंत आणि मैंद ॥ यांचे जानुचरण खंडिले ॥३२॥
नळ नीळ अंजनीसुत ॥ निजले ठायीं केले चूर्णवत ॥ वरकड मर्कटें सैन्य बहुत ॥ राक्षसी सर्व गिळियेलीं ॥३३॥
सेतू पाडिला समग्र ॥ मग कोठें पळतील वानर ॥ शोणिताचे वाहती पूर ॥ जाती भेटों सागरातें ॥३४॥
हें जरी तूं असत्य मानिसी ॥ तरी आतांचि येईल प्रत्ययासी ॥ विद्युज्जिव्ह वेगेंसी ॥ शिर घेवोनि पातला ॥३५॥
तेणें धनुष्य आणि शिर ते वेळे ॥ रामवल्लभेपुढें आणोनि ठेविलें ॥ मुख राजस सांवळे ॥ शोणितें माखलें ते काळी ॥३६॥
किरीटकुंडलें मंडित वदन ॥ सरळ नासिक झळकती दशन ॥ कपाळी केशर आकर्ण नयन ॥ आरक्त रेखांकित जें ॥३७॥
ऐसे देखतां जनकनंदिनी ॥ मूर्च्छना येऊनि पडे धरणी ॥ की अग्नीत पडली कमळिणी ॥ जाय करपोनी जयापरी ॥३८॥
तंव ते दशकंठरिपूची प्रिया ॥ उठे मूर्च्छना सांवरूनियां ॥ हृदयी शिरकमळ धरोनियां ॥ शोक करी अद्भुत ॥३९॥
अहो ते त्रिभुवनपतीची राणी ॥ शोकार्णवीं बुडाली ते क्षणी ॥ तो शोक सांगता उलथे धरणी ॥ कवीची वाणी कुंठित ॥४०॥
म्हणे राजीवाक्षा रघुनंदना ॥ स्मरारिमित्रा जगन्मोहना ॥ अनंतगुणसंपन्ना ॥ काय ऐसें हे केले ॥४१॥
चतुर्दश वर्षेपर्यंत ॥ रघुवीरा श्रमलेति वनांत ॥ कोमळ चरणी बहुत ॥ कंटक हरळ रूतले ॥४२॥
मजकारणें श्रमलां काननी ॥ अहा सीता म्हणवोनी ॥ तृण पाषाण हृदय धरोनी ॥ उद्धरिले की रघुपती ॥४३॥
मजकारणें वाळी मारिला ॥ सूर्यसुत मित्र केला ॥ हनुमंत शुद्धीसी धाडिला ॥ शिळीं बांधिला सागर ॥४४॥
सुवेळे येवोनि सत्वर ॥ वैरियांशी यश दिधले अपार ॥ कां संपविला अवतार ॥ मज भवपुरीं लोटिलें ॥४५॥
रविकुलावतंस श्रावणारी ॥ त्याची स्नुषा मी जनककुमारी ॥ अयोध्याधीशा तुझी अंतुरी ॥ सोडवील आतां मज कवण ॥४६॥
मी परदेशी ये दीन ॥ रघुवीरा कोणासी जाऊं शरण ॥ सूर्यवंशी संपूर्ण ॥ डाग लागला यावरी ॥४७॥
वाल्मीकानें भविष्य केलें ॥ ते अवघें आजि बुडालें ॥ जंबुकें जाऊनि मारिलें ॥ पंचाननासी नवल हें ॥४८॥
अजाखुरींच्या जीवनी ॥ सिंह अडखळोनि पडला कैसेनी ॥ की मूषकाचिये वदनीं ॥ पंचानन सांठवे ॥४९॥
कर्पूराचे पुतळे केवळ ॥ तिहीं उभा ग्रासिला वडवानळ ॥ जगद्भक्षक जो जगीं काळ ॥ त्यासी भूतानें ग्रासिलें ॥५०॥

अध्याय चोवीसावा - श्लोक ५१ ते १००
मशकाची झेंप लागतां ॥ कनकाद्रि पडला खालता ॥ श़ृगालांनी तत्वतां ॥ बांधिला कैसा ऐरावत ॥५१॥
खद्योततेजेंकरोनी ॥ कैसें ब्रह्मांड गेलें आहाळोनी ॥ पिपीलिकाउदरीं जाउनी ॥ सिंह कैसा सांठवला ॥५२॥
लागतां मक्षिकेचा पक्षवात ॥ भयभीत जाहला भोगीनाथ ॥ चित्रींच्या सर्पे अकस्मात ॥ अरुणानुज गिळियेला ॥५३॥
तैसें अघटित घडलें एथ ॥ राक्षसें जिंकिला रघुनाथ ॥ कर्माची गति गहन बहुत ॥ कैसा अनर्थ करूं आतां ॥५४॥
भूधरावतार लक्ष्मण ॥ कैसा रामासि गेला टाकोन ॥ तो अयोध्येसी जाऊन ॥ काय सांगेल भरतातें ॥५५॥
तत्काळ कौसल्या त्यजील प्राण ॥ होईल कैकयीचें समाधान ॥ लागेल सूर्यवंशासी दूषण ॥ जाहलें खंडण वंशाचें ॥५६॥
ऐसा शोक करी मंगलभगिनी ॥ मुखावरी मुख ठेउनि ॥ अश्रुधारा स्रवती ॥ नयनीं ॥ भिजे अवनी ते काळीं ॥५७॥
असो जानकी म्हणे दशमुखा ॥ हे होणार न चुके कर्मरेखा ॥ तरी मिथिलानाथ जनका ॥ समान मज अससी तूं ॥५८॥
आतां माहेर इतुकेंच करी ॥ वन्हिशेज रचोनि झडकरी ॥ या शिरासमवेत निर्धारीं ॥ अग्निमाजीं प्रवेशेन ॥५९॥
सत्व न सांडी जनकनंदिनी ॥ हें रावणासी कळले मनीं ॥ परम म्लानमुख होउनी ॥ गेला निघोनि सभेत ॥६०॥
रावण गेलिया जनकनंदिनी ॥ बुडाली शोकार्णवजीवनी ॥ तंव ते बिभीषणाची राणी ॥ सरमा आली गुप्तरूपें ॥६१॥
ते क्षणक्षणां येऊन घेत जानकीचे दर्शन ॥ सांगे सकळ वर्तमान ॥ जें जें लंकेत वर्तलें ॥६२॥
रघुपतीचें जे कां हित ॥ तें बिभीषणासी करणें अगत्य ॥ तैशीच सरमा येऊन तेथ ॥ सांभाळीत जानकीतें ॥६३॥
नाना सूक्ष्म रूप धरीत ॥ राक्षस कापट्यही जाणत ॥ तितुकें जानकीस श्रुत करित ॥ क्षणक्षणां येऊनियां ॥६४॥
असो सरमा म्हणे जानकीसी ॥ माये शोक किमर्थ करिसी ॥ राम सुखी आहे सुवेळेसी ॥ सकळ सेनेसहित पैं ॥६५॥
तुज वश करावया ये क्षणीं ॥ रावणें कृत्रिम केली करणी ॥ बरवें पाहीं विचारूनी ॥ मूळ दृष्टीं घालोनियां ॥६६॥
जनकात्मजे तव स्वयंवरी ॥ चाप बैसलें रावणाचे उरीं ॥ तें तुझ्या पतीनें झडकरी ॥ द्विखंड करूनि टाकिले ॥६७॥
त्याहूनि चाप जड ये वेळे ॥ प्रहस्तें जाऊनि कैसें आणिलें ॥ कृत्रिमधनु मुंड आणिलें ॥ निर्मून त्याचसारिखें ॥६८॥
ऐसें सरमा जों बोलत ॥ तों धनुष्य शिर जाहलें गुप्त ॥ जैसा वात लागतां अकस्मात ॥ दीप जाय विझोनी ॥६९॥
कीं जलदजालाभीतरीं ॥ इंद्रधनुष्य उमटे क्षणभरी ॥ तैसें कोदंडही झडकरी ॥ गुप्त जाहलें तेधवां ॥७०॥
असो जानकी म्हणे सरमेप्रती ॥ धन्य हो माये तुझी मती ॥ राक्षसांच्या कापट्यगती ॥ तुज समजती सर्वही ॥७१॥
मग अयोध्यापतीची राणी ॥ सरमेसी जवळी बोलावूनी ॥ हृदयीं धरीत प्रीतीकरूनी ॥ म्हणे स्वामिनी होसी लंकेची ॥७२॥
तों देववाणी जाहली अकस्मात ॥ सुखरूप आहे अयोध्यानाथ ॥ सीतेचा आनंद अद्भुत ॥ अंबरामाजी न समाये ॥७३॥
असो इकडे लंकापती ॥ परम चिंताक्रांत एकांतीं ॥ बोलतसे मंदोदरीप्रती ॥ तेंच श्रोतीं परिसिजे ॥७४॥
मंदोदरी परम सज्ञान ॥ पतिव्रता गुणसंपन्न ॥ जिचें सौंदर्य पाहून ॥ मीनकेतन तटस्थ ॥७५॥
मयजेचें इच्छित मन ॥ घ्यावें जानकीचे दर्शन ॥ तो मंदोदरीस दशवदन ॥ बोलता जाहला ते वेळे ॥७६॥
रावण म्हणे शुभकल्याणी ॥ तुवां जाऊनि अशोकवनीं॥ बोधोनियां जनकनंदिनी ॥ मज शयनी वश करीं ॥७७॥
तूं पतिव्रतांमाजी मंडण ॥ एवढें कार्य दे साधून ॥ तंव ते मंदोदरी हास्यवदन ॥ अश्वय म्हणोनि उठली ॥७८॥
चंद्राचे ठायीं कलंक ॥ त्याहून विशेष मयजेचें मुख ॥ अशोकवना तात्काळिक ॥ येती जाहली पतिव्रता ॥७९॥
त्रिजटा म्हणे भूमिकुमरी ॥ तव दर्शना आली मंदोदरी ॥ ऐसें ऐकतां अंतरीं ॥ परम संतोषली जगन्माता ॥८०॥
ते चातुर्यसरोवरमराळिका ॥ मयजा सुगंधचंपककळिका ॥ जैसी सिंहस्थीं जान्हवी देखा ॥ भेटों जाय गौतमीतें ॥८१॥
सीतेचिया चरणांवरी ॥ मयजा जों नमस्कार करी ॥ तो सीतेनें धरूनि झडकरी ॥ हृदयी धरिली प्रीतीनें ॥८२॥
की त्या सिता असिता ॥ एके ठायी मीनल्या तत्वतां ॥ कीं इंदिरा आणि शिवकांता ॥ एकीस एक भेटती ॥८३॥
एक शची एक सरस्वती ॥ एक कृष्णा एक गोमती ॥ एक मंदाकिनी एक भोगावती ॥ मूर्तिमंत पातल्या ॥८४॥
असो वरद भाक विसरून ॥ स्वानंदसमुद्रीं जाहल्या लीन ॥ चतुःषष्ठी अंतःकरण ॥ विरून गेलें रघुनाथीं ॥८५॥
कीं वेदशास्त्रींच्या श्रुती ॥ ऐक्यत्वीं ऐक्यास येती ॥ तैशा आलिंगोनी बैसती ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥८६॥
जे कां विषकंठवंद्यप्रिया ॥ तिजप्रति बोले दशकंठजाया ॥ आजी सुदिन म्हणोनियां ॥ दर्शन जाहलें माये तुझें ॥८७॥
क्षण एक निवांत राहून ॥ मयजा बोले सुवचन ॥ म्हणे सर्वांभूतिं समसमान ॥ रघुनंदन एक असे ॥८८॥
अनेक तरंग एक सागर ॥ बहुत घरें एक अंबर ॥ अनेक मणी एक सूत्र ॥ तैसा रघुवीर व्यापक असे ॥८९॥
एक सुवर्ण बहु अलंकार ॥ बहु तरंग एक नीर ॥ बहुत मातृका एक ओंकार ॥ तैसा रघुवीर व्यापकत्वें ॥९०॥
एक शरीर अवयव अपार ॥ बहुत पत्रें एक तरुवर ॥ बहुत जळचरें एक नीर ॥ तैसा रघुवीर व्यापक असे ॥९१॥
एक चाराचर सर्वांभूतीं ॥ तोच नांदे अयोध्यापति ॥ तरी दशमुखाची केलिया प्रीती ॥ काय स्थिति उणी होय ॥९२॥
सकळ देहीं अयोध्याधीश ॥ तरी वेगळा कां भाविसी लंकेश ॥ सीता दुराग्रह विशेष ॥ व्यर्थ कां करिसी सांग पां ॥९३॥
मयजेचा शब्द ऐकूनी ॥ हंसूनी बोले जनकनंदिनी ॥ अभेद एक चापपाणी ॥ सर्वांभूतीं भरलासे ॥९४॥
सर्वही घट मठ जाण ॥ काय फोडून घातलें गगन ॥ अभेद एक रघुनंदन ॥ दुजेपण तेथें कैेंचें ॥९५॥
मायिक भासे जगडंबर ॥ जैसा मृगजळाचा मिथ्या पूर ॥ वंध्यावल्लीचें पक्व फळ विचित्र ॥ मिथ्यामय लटिकेंचि ॥९६॥
स्वप्नींची संपदा पूर्ण ॥ किंवा आरशांतील धन ॥ कीं दरिद्रियाचे मनोरथ पूर्ण ॥ मिथ्यामय सर्वची ॥९७॥
मिथ्या अलंकार एक सुवर्ण ॥ मिथ्या तरंग एक जीवन ॥ अभेद एक रघुनंदन ॥ तेथें रावण कोण कैंचा ॥९८॥
ब्रह्मानंदस्वरूपावरी ॥ न दिसे दुजेपणाची कुसरी ॥ तेथें सीता आणि मंदोदरी ॥ मिथ्याभास लटिकाची ॥९९॥
कैंची पृथ्वी कैंचे गगन ॥ कैंचें आप तेज पवन ॥ मिथ्या माया कैंचें त्रिगुण ॥ तेथें रावण कोठें आहे ॥१००॥

अध्याय चोवीसावा - श्लोक १०१ ते १५०
जितकें थोर ब्रह्मांड ॥ तैसेंच आकाश प्रचंड ॥ तेथें घट मठ हें बंड ॥ वेगळें व्यर्थ भावावें ॥१॥
तैसा निर्विकार जगजेठी ॥ न चलती द्वैतभावाच्या गोष्टी ॥ तेथें कैंची रावणाची भेटी ॥ बाह्यदृष्टी त्यजीं कां ॥२॥
मयजा म्हणे जानकीसी ॥ सर्वव्यापक अयोध्यावासी ॥ किंवा आहे एकदेशी ॥ सांग मजपाशीं निश्र्चयें ॥३॥
यावरी त्रिभुवनपतीची राणी ॥ बोले विदेहराजनंदिनी ॥ म्हणे त्रिपुटी गेल्या जेथें विरूनी ॥ तटस्थ वाणी निगमांची ॥४॥
ध्येय ध्याता ध्यान ॥ ज्ञेय ज्ञाता ज्ञान ॥ नुरे भजक भज्य भजन ॥ सांग रावण तेथें कैंचा ॥५॥
जें जें दिसे ते ते नाशिवंत ॥ वस्तु एक अभेद शाश्र्वत ॥ मंदोदरी आणि सीता तेथ ॥ कोणीकडे पहाव्या ॥६॥
दोरावर दिसे विखार ॥ शुक्तिकेचे ठायीं रजत साचार ॥ तैसाच मायेचा प्रकार ॥ मिथ्याविकार जाणपां ॥७॥
मयकन्या सावध होय ॥ दृष्टीनें सर्व पाहे अद्वय ॥ निर्विकार वस्तु निरामय ॥ हाही न साहे शब्द जेथें ॥८॥
वस्तु अव्यक्त अनाम ॥ तेथें राम हेंही न साहे नाम ॥ ऐसे जयासी कळे वर्म ॥ आत्माराम तोचि पैं ॥९॥
ऐसा जो जाहला परिपूर्ण ॥ त्यास समाधि आणि विधान ॥ बोलणें आणि मौन ॥ दोनी त्याची विरालीं ॥११०॥
ऐसें जगन्माता बोलत ॥ मयजा ब्रह्मानंदे डुल्लत ॥ समाधि ग्रासोनि तटस्थ ॥ विराला हेत सर्वही ॥११॥
बोलणें आणि संवाद ॥ खुंटोनि जाहला अभेद ॥ ओतला एक ब्रह्मानंद ॥ आनंदकंद जगद्रुरु ॥१२॥
आनंद जिरवून अंतरीं ॥ सावध जाहली मंदोदरी ॥ जगन्मातेचे चरण धरी ॥ सद्द अंतरी होऊनियां ॥१३॥
म्हणे संशय निरसला पूर्ण ॥ धन्य धन्य आजिचा दिन ॥ विदेहकन्येचे चरण ॥ वारंवार धरी मग ॥१४॥
ब्रह्मानंदें म्हणे श्रीधर ॥ धन्य तो दिवस साचार ॥ सत्संगें आत्मविचार ॥ सारासार होय पैं ॥१५॥
भागीरथी सर्वत्र पवित्र ॥ परी प्रयागमहिमा अपार ॥ तैसा रामविजय परिकर ॥ मंदोदरीसंवाद हा ॥१६॥
सर्वत्रां सुलभ ते भीमा ॥ परी पंढरीस अगाध महिमा ॥ स्नान करितां कर्मांकर्मां ॥ पासूनि मुक्त होईंजे ॥१७॥
असो सीतेची आज्ञा घेउनी ॥ स्वधामा गेली मयनंदिनी ॥ रावणाप्रती जाऊनी ॥ वर्तमान सांगतसे ॥१८॥
तप्तलोहावरी उदक पडलें ॥ तें माघारें निघे एकवेळे ॥ परी जानकी कदा काळें ॥ वश नव्हे तुम्हासी ॥१९॥
मृगजळी बुडेल अगस्ति ॥ तमकूपीं पडेल गभस्ति ॥ हेंही घडे परी सीता सती ॥ वश नोहे तुम्हांतें ॥१२०॥
जे गोष्टीनें होय अनर्थ ॥ आपले कुळाचा होय घात ॥ ऐशिया बुद्धीनें पंडित ॥ काळत्रयीं न वर्तती ॥२१॥
हातीचें टाकूनि सुवर्ण ॥ कां बळेंच घ्यावें शेण ॥ गोड शर्करा वोसंडून ॥ राख कां मुखीं घालावी ॥२२॥
मुक्तें सांडोनि परिकरें ॥ कां पदरीं बांधावीं खापरें ॥ वोसंडूनि रायकेळें आदरें ॥ अर्कीफळें कां भक्षावी ॥२३॥
याकरितां द्विपंचवदना ॥ सोडावी रामाची अंगना ॥ कायावाचामनें जाणा ॥ रघुनंदना शरण रिघावें ॥२४॥
परसतीचा अभिलाष ॥ महापुरुषास ठेवणें दोष ॥ बळवंतावरी बांधणें कास ॥ मग अनर्थास काय उणें ॥२५॥
विवसी हे परम सीता ॥ अनर्थकारक घोर वनिता ॥ हे नेऊन द्यावी रघुनाथा ॥ तरीच तुम्हां कल्याण ॥२६॥
महासर्प उशी घेउनी ॥ कैसा निजेल सुखशयनीं ॥ बळेंच गृहास लाविल्या अग्नि ॥ मग अनर्थासि काय उणें ॥२७॥
परद्रव्याचा अभिलाष ॥ जाणोनि प्राशन करणें विष ॥ करितां परनिंदा द्वेष ॥ मग अनर्थासी काय उणें ॥२८॥
परम साधु बिभीषण ॥ तुमचा अविवेक देखोन ॥ अयोध्यापतीस गेला शरण ॥ जन्ममरण चुकविलें ॥२९॥
परम प्रतापी रघुनंदन ॥ उदधीवरी तारिले पाषाण ॥ हा प्रताप तुम्ही जाणून ॥ द्वेषबुद्धि कां धरितां ॥१३०॥
ऐशिया शब्दसुमनेंकरून ॥ मयजेनें पूजिला रावण ॥ मग प्रत्युत्तर हांसोन ॥ देता झाला ते काळी ॥३१॥
प्रिये तूं बोलसी वचनें ॥ तीं मज मानलीं बहुत गुणें ॥ परी आपुला पुरुषार्थ टाकणें ॥ तरी जिणें व्यर्थ लोकीं ॥३२॥
चिरंजीव जाहला बिभीषण ॥ प्रळयी तरी पावेल मरण ॥ तोंवरी देहलोभ धरून ॥ बैसतां काय सार्थक ॥३३॥
कल्पपर्यंत जीवूनी ॥ पडिले शरीर बंदिखानीं या पुरुषार्थासी शुभ कल्याणी ॥ मानी कोण सांगपां ॥३४॥
आदि पुरुष रघुनंदन ॥ हें मी जाणें सर्व वर्तमान ॥ तो मजसी युद्धकामना धरून ॥ सागर उतरूनि आला आहे ॥३५॥
त्याची वासना न पुरवितां ॥ कदा माघारी नेदी सीता ॥ तरी मी आपुल्या पुरुषार्था दावोनि राघवा जिंकीन ॥३६॥
ऐसें ऐकोनि ते अवसरीं ॥ चिंताक्रांत होऊनि मंदोदरी ॥ प्रवेशली निजमंदिरी ॥ क्लेशचक्रीं पडियेली ॥३७॥
असो आतां यावरी ॥ रावण चढला गोपुरीं ॥ जैसा बलाहक पर्वतशिखरीं ॥ कृष्णवर्ण उतरला ॥३८॥
चपळेहून तेज आगळे ॥ आंगी अलंकार मिरविले ॥ दाही छत्रे ते वेळे ॥ मस्तकावरी विराजती ॥३९॥
भोंवते सेवकजन बहुत ॥ उपभोग देती समस्त ॥ इकडे बिभीषण रामासी दावित ॥ रावण गोपुरीं चढला तो ॥१४०॥
श्रीराम म्हणे ते अवसरीं ॥ हा परम उंच सुवेळागिरी ॥ अवघे वळंघोनियां वरी ॥ लंकापुरी पाहूं चला ॥४१॥
ऐसें बोलतां अयोध्याधीश ॥ उठले तत्काळ कपिपुरुष ॥ सुवेळाचळीं आसपास ॥ चढले तेव्हां वायुवेगें ॥४२॥
जैशा कनकाचळावरी ॥ चढल्या निर्जरांच्या हारी ॥ तैसा वानरांसह ते अवसरीं ॥ अयोध्याविहारी चढतसे ॥४३॥
रघुपतीचे दोनी कर ॥ धरिती बिभीषण सूर्यकुमर ॥ सुवेळाचळीं रघुवीर ॥ कैसा शोभला ते काळीं ॥४४॥
उदयाचळावरी बाळमित्र ॥ ऐरावतावरी सहस्रनेत्र ॥ कैलासावरी कर्पूरगौर ॥ त्रिभुवनेश्र्वर दिसे तेवीं ॥४५॥
जो लावण्यमृतसागर ॥ स्मरारिमित्र मनोहर ॥ झळकती समुद्रदत्त अलंकार ॥ चपळेहूनि तेजागळे ॥४६॥
तेणें शोभला अयोध्यानाथ ॥ दिव्य पीतवसन विराजत ॥ असो गोपुरावरी लंकानाथ ॥ विलोकित रामाकडे ॥४७॥
वानरांसहित रावणारी ॥ शोभतसे सुवेळाद्रीवरी ॥ जैसा इंद्रादि सकळ सुरवरीं ॥ वैकुंठपति वेष्टिला ॥४८॥
कीं अनंत श्रुत्यर्थ समवेत ॥ तो वेदोनारायण विराजत ॥ किंबाहुना वृक्षांसहित ॥ कल्पद्रुम विराजे ॥४९॥
तैसा महावीरीं वेष्टित ॥ शोभतसे सीताकांत ॥ परी ते समयीं सूर्यसुत ॥ कर्म अद्भुत करिता जाहला ॥१५०॥
 
अध्याय चोवीसावा - श्लोक १५१ ते २१७
कुंजर दृष्टीं देखोन ॥ उगा न राहे पंचानन ॥ कोणास न पुसतां मित्रनंदन ॥ अकस्मात उडाला ॥५१॥
वज्र पडे पर्वतशिखरी ॥ तैसा सुग्रीव ते अवसरीं ॥ येऊन आदळला रावणावरी ॥ परमावेशें करूनियां ॥५२॥
सव्यहस्तचपेटेतळीं ॥ दाही छत्रे खाली पाडिलीं ॥ वामहस्तघायें तळीं ॥ मुगुट सर्व पाडिले ॥५३॥
जैसी विंध्याद्रीवरी अकस्मात ॥ विद्युल्लता येऊन पडत ॥ तैसा अर्कजें केलें विपरीत ॥ लंकानाथ घाबरला ॥५४॥
मग लत्ताप्रहार ते वेळां ॥ सुग्रीवानें समर्पिला ॥ सवेंच हृदयीं दिधला ॥ मुष्टिघात ते वेळीं ॥५५॥
मल्लयुद्ध परम अद्भुत ॥ जाहलें एक घटिका पर्यंत ॥ रावण म्हणे वाळीऐसें त्वरित ॥ धरून नेईल सुग्रीव हा ॥५६॥
रामापाशी नेऊन त्वरित ॥ विंटंबील सूर्यसुत ॥ पळावयासी निश्र्चित ॥ मार्ग कोठे दिसेना ॥५७॥
षोडश खणांचे गोपुर ॥ तयावरूनि महावीर ॥ कोसळले तेव्हां लंकानगर ॥ गजबजिलें एकदांचि ॥५८॥
एक म्हणती आला हनुमंत ॥ नगर जाळावया समस्त ॥ एक म्हणती समुद्रांत लंका घालील पालथी ॥५९॥
असो तेव्हां दशकंधर ॥ चुकवोनियां पैं सत्वर ॥ पळाला वेगें जैसा तस्कर ॥ जागा होतां गृहस्वामी ॥१६०॥
मृगेंद्राचे कवेंतून देख ॥ पूर्वभाग्यें सुटला जंबुक ॥ कीं भुजंगकवेंतूनि मूषक ॥ पळोनि जाय स्वस्थळा ॥६१॥
असो सुग्रीव तेथोनि उडाला ॥ सुवेळागिरीं पावला ॥ एकचि जयजयकार जाहला ॥ हृदयीं धरिला रघुनाथें ॥६२॥
वृदाकर गगनींहूनी ॥ पुष्पें वर्षती ते क्षणीं ॥ धन्य सुग्रीव म्हणोनी ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥६३॥
श्रीराम सूर्यकुमरा ॥ आजी बृहस्पति चेवला विचारा ॥ तैसें तूं महावीरा ॥ केलें होतेस विपरीत ॥६४॥
समीप असतां सर्व दळें ॥ पुढें उडी न घालावी भूपाळें ॥ असो जय पावला शीघ्रकाळें ॥ हाच लाभ थोर आम्हां ॥६५॥
तेव्हां आणोनि पुष्पजाती ॥ वानरीं पूजिला किष्किंधापती ॥ दळभारेंसी सीतापती ॥ पूर्वस्थळास उतरला ॥६६॥
सकळ जुत्पत्तिंसह रघुनंदन ॥ बैसला तेव्हा सभा करून ॥ सुग्रीव आणि बिभीषण ॥ अवघे जवळी बैसले ॥६७॥
राजाधिराज रामचंद्र ॥ जो चातुर्यगुणसमुद्र ॥ राजनीति बहुविचार ॥ करिता झाला ते समयीं ॥६८॥
म्हणे आतां द्विपंचवदन ॥ सीता नेदी युद्धाविण ॥ यावरी मग बिभीषण ॥ बोलता जाहला तेधवां ॥६९॥
म्हणे साम दाम दंड भेद करून ॥ शत्रु कीजे आपणाधीन ॥ ओळखूनि समयाचेंं चिन्ह ॥ तैसें चातुरीं वर्तावें ॥१७०॥
मंत्रें आकर्षिजे विखार ॥ उदकें शांतविजे वैश्र्वानर ॥ वेदांतज्ञानें भवसमुद्र ॥ उतरूनि जावें पैलतीरा ॥७१॥
कामक्रोधादि शत्रु थोर ॥ विवेकें जिंकावे साचार ॥ भक्तिबळें सर्वेश्र्वर ॥ आपणाधीन करावा ॥७२॥
शमदमबळेंकरून ॥ मनोजय करिती सज्ञान ॥ व्यत्पुत्तीच्या बळेंकरून ॥ अर्थ काढिती पंडित ॥७३॥
पाषाणाखाली सांपडे हात ॥ तो युक्तीनें काढावा अकस्मात ॥ बळें करूनि ओढितां प्राप्त ॥ व्यथा मात्र होय पैं ॥७४॥
तैसे आधीं साम करून ॥ वश करावा द्विपंचवदन ॥ समयोचित जाणे ज्ञान ॥ ऐसा शिष्टाईस पाठवा ॥७५॥
सभेसि बैसतां जाऊन ॥ दिसे जैसा बृहस्पति प्रवीण ॥ सरस्वती जयासी प्रसन्न ॥ यमयोचित शब्द देत ॥७६॥
वेदशास्त्रपुराण ॥ हे जयासी करतलामलक पूर्ण ॥ तेजस्वी जैसा चंडकिरण ॥ सभास्थानीं तेवी दिसे ॥७७॥
जरी वरी लोटले शत्रु समस्त ॥ ते समयीं जैसा वैवस्वत ॥ जैसा कलशोद्भव निश्र्चित ॥ शत्रुसागर प्राशावया ॥७८॥
हृदय निर्मळ कपटरहित ॥ भोळा जैसा उमाकांत ॥ श्रेष्ठत्वें सभेंत विराजत ॥ शचीनाथ ज्यापरी ॥७९॥
ईश्र्वरीं जयाचे प्रेम ॥ संतांसी मित्रभाव परम ॥ आचरे सदा सत्कर्म ॥ क्रोध काम दवडोनीयां ॥१८०॥
यालागीं जगद्वंद्या राघवा ॥ या चिन्हीं मंडित बरवा ॥ ऐसा शिष्टाईस पाठवावा ॥ मयजाधवाजवळिकें ॥८१॥
तरी नर वानर रीस ॥ कोणास पाठवूं शिष्टाईस ॥ तुम्ही आम्हीं किष्किंधाधीश ॥ विचार एक काढावा ॥८२॥
वारणचक्रांत रिघोन ॥ स्वकार्य साधी पंचानन ॥ कीं एकलाचि जाऊन सुपर्ण ॥ अमृतकुंभ घेऊन आला ॥८३॥
एकलाच जाऊन गुरुपुत्र ॥ साधून आला संजीवनी मंत्र ॥ कीं सागर उडोनि रुद्रावतार ॥ शुद्धि करूनि पातला ॥८४॥
तैसेंचि कार्य साधून ॥ सत्वर येई परतोन ॥ ऐसा पाठवावा निवडोन ॥ शीघ्रकाळीं तत्वतां ॥८५॥
ऐसें बोलतां बिभीषण ॥ परम संतोषला रघुनंदन ॥ म्हणे धन्य तुझें ज्ञान ॥ सकळकळाप्रवीण होसी ॥८६॥
रत्नराशी पडल्या अपार ॥ त्यांत अनर्घ्यरत्न प्रभाकर ॥ परीक्षक निवडती तैसा वीर ॥ वाळिपुत्र काढिला ॥८७॥
बिभीषण म्हणे राजीवनेत्रा ॥ जलदवर्णा चारुगात्रा ॥ पद्मोद्भवजनका स्मरारि मित्रा ॥ अंगदासी पाठवावें ॥८८॥
हा सर्व लक्षणी आहे चतुर ॥ जैसा नवग्रहांत दिनकर ॥ कीं विखारांत धरणीधर ॥ तैसा वानरांत अंगद हा ॥८९॥
कीं शास्त्रांमाजी वेदांत ॥ शस्त्रांत सुदर्शन लखलखित ॥ कीं पक्ष्यांमाजी विनतासुत ॥ बळें उद्भुत तैसा हा ॥१९०॥
ऐकतां तोषला रघुनंदन ॥ म्हणे हे तुम्ही उतम निवडिलें रत्न ॥ तंव तो अंगद कर जोडून ॥ रघुपतीप्रति बोलत ॥९१॥
म्हणे पुराणपुरुषा परमानंदा ॥ भक्तहृत्पद्मकोशमिलिंदा ॥ जगदंकुरमूळकंदा ॥ आज्ञा काय ते मज द्यावी ॥९२॥
राजीवाक्षा रणरंगधीरा ॥ असुरकाननवैश्र्वानरा ॥ जनकजामाता अतिउदारा ॥ आज्ञा काय ती मज सांगा ॥९३॥
चराचरफलांकितद्रुमा ॥ विशाळभाळा पूर्णकामा ॥ अजअजित आत्मारामा ॥ आज्ञा काय ती मज सांगा ॥९४॥
रावण आणि कुंभकर्ण ॥ ये क्षणीं येथें आणूं बांधोन ॥ कीं हे लंका उचलून ॥ घालूं पालथी सागरीं ॥९५॥
ऐकोन अंगदाचे बोल ॥ संतोषला तमालनीळ ॥ म्हणे धन्य तो वाळी पुण्यशीळ ॥ अद्भुत बळ तयाचें ॥९६॥
कक्षेसी दाटोनि रावण ॥ चतुःसमुद्रीं केले स्नान ॥ त्याचे पोटी पुत्रनिधान ॥ बळ गहन तैसेंच तुझें ॥९७॥
तरी लंकेसी जाऊन ये समयीं ॥ रावणासी करी शिष्टाई ॥ म्हणावे जानकीस देईं ॥ सामोपचारें करूनियां ॥९८॥
तुवां मज न कळतां येऊन ॥ चोरिले जानकीचिद्रत्न ॥ तरी एकदा क्षमा केली पूर्ण ॥ देईं आणोनि झडकरी ॥९९॥
सीता देतांचि तात्काळ ॥ तूं लंकेसी नांदसी अचळ ॥ नाही तरी निर्मूळ कु ळ ॥ तुझें करीन निर्धारें ॥२००॥
ऐसें ऐकतां वाळिसुत ॥ नमसकारिला जनकजामात ॥ आज्ञा घेऊन त्वरित ॥ गगनपंथें उडाला हो ॥१॥
दशमुखाचे सभेआंत ॥ उतरता जाहला अकस्मात ॥ कीं वानररूपें जैसा आदित्य ॥ एकाएकीं प्रगटला ॥२॥
कीं वैकुंठाहूनि सर्पारी ॥ अवचिता येत उर्वीवरी ॥ कीं कर्मभूमीस निर्धारी ॥ योगभ्रष्ट उतरला ॥३॥
दृष्टीं देखतां अंगदवीर ॥ चमकले सभेचे असुर ॥ शस्त्रें उभारूनि समग्र ॥ सरसावले ठायी ठायी ॥४॥
म्हणती एकचि आला वानर ॥ तेणें पूर्वी जाळिलें लंकानगर ॥ सुग्रीवें गोपुरीं येऊनि समग्र ॥ छत्रे पाडिली रावणाचीं ॥५॥
हा निर्भय निःशंक बहुत ॥ एकलाचि आला सभेआंत ॥ असो चहुंकडे तारासुत ॥ पाहे न्याहाळोनि सभेतें ॥६॥
मग बोले वाळिनंदन ॥ सभेस आला जो परमस्थळींहून ॥ त्यासी न पुसती सभाजन ॥ तरी ते शतमूर्ख जाणावे ॥७॥
श़ृगालसभेत पंचानन ॥ येतां दचकती अवघेजण ॥ कीं देखतां विनतानंदन ॥ विखार जैसे दचकती ॥८॥
कीं उदया येतां दिनकर ॥ दिवाभीतें विटती समग्र ॥ कीं इंदु विलोकितां तस्कर ॥ कंटाळिती जैसे कां ॥९॥
कीं पंडित येतां सभेप्रति ॥ मनी विटती अल्पमति ॥ कीं ते कोकिळ गर्जती वसंतीं ॥ वायस मानिती संताप ॥२१०॥
दृष्टीं देखतां संतभक्त ॥ निंदक विटती समस्त ॥ तैसे तुम्ही राक्षस उन्मत्त ॥ मज देखतां त्रासलेती ॥११॥
मग सभास्तंभ पृष्ठीं घालून ॥ पुच्छासनीं बैसे वालिनंदन ॥ उंच दिसे रावणाहून ॥ तेजें करूनी विशेष ॥१२॥
म्हणे गर्विष्ठा दशवदना ॥ मी आलों असे कवण्या कारणा ॥ तें कां न पुससी मलिना ॥ कोणें विचारें सांग पां ॥१३॥
मी आहे शक्रात्मजसुत ॥ अयोध्यापतीचा असें दूत ॥ तरी मी शिष्टाईस आलों येथ ॥ अंतर तुझें पहावया ॥१४॥
याउपरी वीर अंगद ॥ रावणासी करील बोध ॥ तें संतीं परिसावें विशद ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥१५॥
रविकुलभूषण रघुवीर ॥ जो साधुहृदयपंकजकीर ॥ तो ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अभंग साचार न विटे कदा ॥१६॥
स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ चतुर्विंशतितमोध्याय गोड हा ॥२१७॥
अध्याय ॥२४॥
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shubh Ravivar Status शुभ रविवार

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

रविवारी माघ पौर्णिमेला या १० दानांपैकी एक करा आणि तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद घ्या

भगवान विश्वकर्मा यांची जयंती, त्याचे महत्त्व आणि पूजा पद्धत जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments