ब्रिटनची महाराणी क्वीन एलिझाबेथ (द्वितीय) यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं. राणी एलिझाबेथ यांच्या निधनांनंतर महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राणी एलिझाबेथ यांच्या साठी एक ट्विट केलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे:
" ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे.
कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ २ ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ २ ह्यांच एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाचं असेल. एलिझाबेथ ह्यांच्या स्मृतीस अभिवादन. "