Publish Date: Tue, 05 Nov 2019 (10:03 IST)
Updated Date: Tue, 05 Nov 2019 (10:07 IST)
‘ग्रंथ तुमच्या दारी’ चळवळ ही अक्षर नात्याबरोबरच मराठी संस्कृती जपण्याचे व जोपासण्याचे काम करत आहे. त्यातून समृध्द मनाची साखळी तयार होत आहे. साहित्याचा अर्थच मानवी मूल्यांची जोपासना आहे, असे प्रतिपादन विश्वास गु्रपचे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर यांनी केले.
विनायक रानडे प्रणेते असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ग्रंथ पेटीचा कोलंबो (श्रीलंका) येथे शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी श्री.ठाकूर बोलत होते.
मूळचे नाशिकचे पण सध्या कोलंबो येथे असलेले श्रीनिवास पत्की हे योजनेचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. कोलंबोतील मराठी वाचकांना यामुळे मराठीतील अभिजात वाडमय उपलब्ध झाले आहे.
यावेळी विनायक रानडे म्हणाले की, जगभरात मराठी भाषेला, संस्कृतीचा गौरव केला जातो. मराठीतील अनेक लेखकांचे साहित्य नवी पिढी वाचत आहे.
श्रीनिवास पत्की म्हणाले की, मराठी संस्कृतीच्या एका महत्त्वाच्या घटनेचे साक्षीदार होण्याचा हा सन्मान आहे. याप्रसंगी डॉ.कैलास कमोद, डॉ.वासुदेव भेंडे, अजित मोडक, अमर भागवत, नितीन महाजन, डॉ.सुभाष पवार, डॉ.चंद्रकांत संकलेचा, विक्रम उगले, विलास हावरे, अमित शहा, मंगेश पंचाक्षरी, दीपांजली महाजन, मंगला कमोद, ज्योती ठाकूर, माधुरी हावरे, अनघा मोडक, लता भेंडे, शितल पवार, लिना शाह, अर्चना भागवत, रूचिता ठाकूर, कादंबिनी ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते.