थंडीत आंघोळीनंतर शरीर खसखसून न पुसता हळूच टिपावे. तेलाच्या हाताने हलकी मॉलिश करावी. त्यानंतर लगेच त्यावर पाणी टाकून किंवा पुसू नये, नाहीतर जे पाणी त्वचेत सामावले आहे ते उडून पुन्हा त्वचा कोरडी होईल.
सर्वसाधारणपणे खोबरेल तेलच लावावे. थंडीत ते घट्ट होत असल्याने काही लोक मोहरीचे (सरसो) तेल लावतात. सामान्य त्वचेसाठी ते ठिक आहे पण एलर्जीक व जास्त कोरडी त्वचा असणार्या लोकांना त्यामुळे जास्तच त्रास होतो.
या दोन तेलांखेरीज गोडं तेल (याबीन, सनफ्लॉवर, करडई, किंवा ऑलिव्ह ऑईल) पण वापरता येते. तेलाशिवाय, पाणी व ग्लिसरीन समप्रमाणात एकत्र करून ते आंघोळीनंतर लावल्यासही अपेक्षित परिणाम लक्षात येतो.
लोकरीचे किंवा गरम कपडे शरीराच्या वर लगेच न घालता प्रथम मऊ, सुती कपडे परिधान करून मगच त्यावर हवे तसे गरम कपडे चढवावेत.
थंडीत त्वचारोगांचे प्रमाण वाढते. तारुण्यपिटीकांचे प्रमाणही वाढते. तारुण्य पिटीकांसाठी वापरल्या जाणार्या औषधांमुळे त्वचा आणखीनच कोरडी होते. म्हणून त्वचेचा कोरडेपणा दूर करणारी क्रीम त्वचा नरम करून ओलावा तर आणते पण त्यामुळे चेहर्यावरचे फोड (तारूण्यपिटीका) वाहू लागतात त्यामुळे आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच क्रीम वापराव्यात.
लहान मुलांमध्ये आढळणारा Atopic Exzima थंडीत जास्तच सक्रीय होतो. यात त्वचा खूपच कोरडी होते. त्याच्या त्रासामुळे मुलांबरोबरच पूर्ण कुटुंब हैराण होते. यात महत्वाची गोष्ट म्हणजे शरीराची सफाई कशी करवी, त्यानंतर कोणते क्रीम किती प्रमाणात लावावे तसेच मुलांना कसे कपडे घालावेत हे सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानीच करावे. वैद्य हकीम तसेच बाजारू औषधांचा प्रतिकूल परिणाम होणे स्वाभाविकच आहे. याप्रमाणे हायपोथॉयरॉईड रोगाने ग्रस्त बायका व 40 पेक्षा जास्त वय असणार्या व्यक्ती ज्यांची त्वचा वरचेवर कोरडी होत आहे त्यांनी थंडीत (दिवाळी ते होळी) आपली त्वचा योग्य पद्धतीने साफ करून, आंघोळीनंतर योग्य प्रमाणात योग्य क्रीम लावावे.
फुटलेल्या ओठांवर कधीही जीभ फिरवू नये कारण थुंकीत असणारे Enzymes त्रास वाढवतात व आपल्या ओठाजवळची त्वचा काळवंते. तसेच पाणी प्यायल्यावर लगेच ओल्या ओठांवर तूप लावावे याशिवाय योग्य व्यायाम, भरपूर पाणी, योग्य खाद्यतेलाचा जेवणात वापर तसेच Heater चा अतिरेक टाळल्यास दिवाळीपासून होळीपर्यंतचा हा काळही आनंदात व उत्साहात जाईल.