नाशिक शहरामध्ये ७०पेक्षा अधिक उंट ताब्यात घेतल्यानंतर आता असाच प्रकार मालेगावमध्ये उघडकीस आला आहे. मालेगावात तब्बल ४३ उंट ताब्यात घेण्यात आले आहे. हे मोठे रॅकेट असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
नाशिक पाठोपाठ मालेगाव मध्ये परराज्यातून बेकायदा उंट वाहतूक करण्यात येत असल्याच समोर आले आहे. मुंबई-आग्रा महामार्गाने या उंटांची वाहतूक केली जात होती. मालेगावमधून ४३ उंटांची वाहतूक होत असल्याची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. बेकायदा आणि निर्दयीपणे सुरु असलेली वाहतूक तालुका पोलिसांनी शिताफीने रोखली आहे. याप्रकरणी प्राणी संरक्षण कायद्या प्रमाणे ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन उंट आजारी असल्याने त्यांच्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. सर्व उंटाना शेंदुर्णी येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.