पंतप्रधान मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं. आज मुंबईच्या विकासाशी संबंधित ४० हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
देशभरात रेल्वेला आधुनिक मिशन मोडवर काम सुरू आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला देखील यातून फायदा होतो आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारला सामान्य माणसालाही तीच आधुनिक सुविधा आणि विकासाच्या गतीचा अनुभव द्यायचा आहे. रेल्वे स्थानकांसह विमानतळांसारखं विकसित केलं जातं आहे. आता देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. त्याच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकासही केला जातो आहे. देशातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळे मुंबईचा अभूतपूर्व विकास होतो आहे. तसंच मुंबईला भविष्यासाठी तयार करणं ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आम्ही विकासाच्या मार्गात राजकारण आणत नाही
मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येला मी समजू शकतो. भाजपाचं सरकार असो किंवा एनडीएचं सरकार असो आम्ही विकासाच्या पुढे राजकारण कधीही आणत नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासात अडथळे आणत नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि करण्यात आलं. त्या कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.